मालवण : आमदार वैभव नाईक हे चार वेळा छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाच वेळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटूनही कुडाळ मालवण मतदारसंघात उमेदवारी बाबत शब्द कोणी दिला नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून वैभव नाईक सैरभैर झाले आहेत. त्यांना आमदारच व्हायचे असेल तर केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. या तिघांनी ठरवलं तर वैभव नाईक आमदार होतील असा टोला भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावला आहे.
कुडाळ येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी त्यावर टीका केली होती. या टीकेला धोंडी चिंदरकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. चिंदरकर यांनी म्हटले आहे, कुडाळ मतदार संघात कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळणार नाही याची पक्की खात्री झाल्यानेच वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झालेत. तब्बल चारवेळा छुपे पद्धतीने शिंदेना तर चार ते पाच वेळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना भेटून सुद्धा मालवण कुडाळ मतदार संघातून उमेदवारीचा शब्द कोणीही दिला नाही. उलट पक्षी शासन आपल्या दारी कार्यक्रमाने आपली उरली सुरली आशा संपल्याचे लक्षात आल्याने वैभव नाईक चिडचिड करायला लागलेत. खरंतर आता भाजपचा उमेदवार कोण असणार याचे सुद्धा स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मात्र, वैभव नाईक यांना पुन्हा आमदारच व्हावंसं वाटत असेल आणि या जिल्ह्याचा शाश्वत विकास व्हावा असं मनापासून वाटत असेल तर मंत्री नारायण राणे, रविंद्र चव्हाण आणि केसरकर यांच्याशी जुळवून घेतलं तर नारायण राणे मोठ्या मनाने माफ करतील आणि विधान परिषदेसाठी वरील तिघांनी ठरवलं तर आमदार म्हणून परत संधी मिळेल. यातच त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं हित आहे.
आता मालवण कुडाळ मतदार संघातून विधानसभेसाठी निलेश राणे हे नावं फिक्स आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते सक्षम आहेत. फक्त एवढ्या तरुण वयात नाईकांची राजकीय एक्झिट नको म्हणून हा प्रयोग करायला हरकत नाही. भविष्यात अनेक उबाठा कार्यकर्ते काही भा ज पवासी तर काही शिवसैनिक (शिंदे गट ) होतील. म्हणून वैभव नाईक सुज्ञ आहेत ते लवकरच योग्य निर्णय घेतील आणि त्यांचं स्वागत असेल असेही चिंदरकर म्हणाले.