सिंधुदुर्ग : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यापासून जालना सराटी येथे पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस जाहीर पाठिंबा देत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी जाहीर केले आहे. याचं पत्र वकील सुहास सावंत यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,भास्कर परब,नजीर शेख, पुंडलिक दळवी, संग्राम सावंत, आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पाठिंबा दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आंदोलनामुळे महाराष्ट्र पेटून उठला असतानाही महायुती सरकार कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता वेळ काढू धोरण आखून मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे, हे मराठा समाजाच्या विरोधी सरकार आहे, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आली तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल असे जाहीर वक्तव्य केले होते, आता त्यांना सत्तेवर येऊन दिड वर्ष झाले तरी मराठा समाज आरक्षणावर निर्णय न घेता मराठा समाज आंदोलनात फूट कशी पडेल यासाठी कुट नितीचा पडद्याआडून हालचाली करून मराठा आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा सुरू आहे, हे न समजायला मराठा समाज दूधखुळा नाही, हे देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारने लक्षात ठेवावे,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द जरांगे पाटील यांना दिला होता त्या आश्वासनावर विश्वास ठेवून जरांगे पाटील पाटील यांनी पहिले उपोषण मागे घेतले होते, ते अभिवचन मुख्यमंत्री यांनी पाळले नाही म्हणून पून्हा जरांगे पाटील यांनी उपोषण पुकारले आहे. दसरा मेळाव्य आझाद मैदानावर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्पर्श करून शपथ घेऊन सांगितले मराठा समाजाला आरक्षण देणारच, मग आता टोलवाटोलवी का ? मुख्यमंत्र्यांची खरी मजबूती आहे देवेंद्र फडणवीसच, देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाज आरक्षणाचा खरा अडथळा आहे, मराठा समाज आरक्षण विरोधात सुप्रीम कोर्टात गुणरत्न सदावर्ते वकीलपत्र कोणाच्या आदेशाने घेऊन गेले?सदावर्तेचा मास्टर माईंड कोण? हे संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेष भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त करून, मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून राष्ट्रवादी कॉंग्रेस मराठा समाजासोबत यापुढेही प्रामाणिकपणे राहील, असे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत या पत्राद्वारे दीले आहे.