रविंद्र चव्हाणांवर नारायण राणेंना विश्वास नाही..? | असं का बोलले वैभव नाईक..?

Edited by:
Published on: August 16, 2023 14:04 PM
views 620  views

मालवण : गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई गोवा महामार्गाची अवस्था दयनीय बनली आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास धोकादायक बनणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण करून घेण्यात आले. हा महामार्ग केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून केंद्रीयमंत्री असलेले नारायण राणे उर्वरित महामार्गाची दुरुस्ती करण्यास असमर्थ ठरले आहेत. तर दुसरीकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे खड्डेमय झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र रविंद्र चव्हाण यांच्यावर नारायण राणेंना विश्वास नसल्याने राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीसाठी निवेदन देऊन मागणी केली. असा टोला आमदार वैभव नाईक यांनी राणेंना लगावला आहे.

वैभव नाईक म्हणाले, गेले दिड वर्षे  रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. परंतु राणेंनी अद्यापही  रविंद्र चव्हाण यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही. आपल्या मुलाला मंत्री बनवून पालकमंत्री करण्यासाठी राणेंनी लॉबिंग केली होती मात्र  ती फेल ठरल्याने जिल्ह्यात भाजप विरहित आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी राणेंची  धडपड सुरु आहे. त्यामुळे नारायण राणेंची  रविंद्र चव्हाण यांच्याबाबतीत असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर येत आहे. रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेली विकासाची कामे रखडविण्यासाठी राणे पडद्यामागची  भूमिका बजावत आहेत. त्यामुळे एकंदर  जिल्ह्याच्या  विकासाचा खेळ सुरु आहे. राणेंनी आपल्याच भाजप पक्षाच्या पालकमंत्र्यांवर विश्वास न ठेवल्यास जनता आणि विरोधक तरी विश्वास कसे ठेवतील? असा प्रश्न आ.वैभव नाईक यांनी उपस्थित करत पालकमंत्र्यांना  जिल्ह्याच्या विकासासाठी आपले कायम सहकार्य राहील  असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे. राणे पिता पुत्र हे महामार्गावरील टोलनाक्याचे टेंडर मिळवून टोल वसुली सुरू करण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यामुळे टोलनाक्यासाठीच राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती का? अशीही शंका लोकांच्या मनात उपस्थित होत असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.