आंबोली घाटात गोव्यातील मुलीचा खून..?

Edited by:
Published on: September 01, 2023 12:59 PM
views 2993  views

सावंतवाडी : गोव्यातील ३० वर्षीय तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. खून करून आंबोलीत फेकल्याची प्रियकराची जबानी, गोवा पोलीस तिच्या प्रियकरासह आंबोलीकडे रवाना झाल्याची माहिती मिळतेय.


प्रेम पुढे चालू ठेवण्यास नकार दिल्याने प्रियकर सतावू लागल्यानंतर तरुणीने त्याच्या विरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याला बोलावून समज दिली आणि सोडून दिले. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेपासून ती तरुणी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले असता तिचे मोबाईल लोकेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात मिळाले आहे. त्यामुळे संशयित प्रियकराला घेऊन पोलीस तिचा शोध घेण्यासाठी आज सायंकाळी आंबोलीत जाणार आहेत. पर्वरीत गॅरेज चालवणारा प्रकाश चुंचवाड (२२) याचे कामाक्षी (३०) नामक तरुणीवर प्रेम जडले होते. कालांतराने त्यांच्यात वाद होऊ लागल्याने कामाक्षीने प्रेम प्रकरण पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. मात्र, प्रकाशला ही गोष्ट रुचली नाही. तो तिला सतावू लागला. 


मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री प्रकाश समज देण्यासाठी कामाक्षीने म्हापसा येथे बोलवले होते. तिथे त्यांच्यात भांडण झाले, सोबत कामाक्षीचा मित्र आणि मैत्रीण होते. प्रकाशने कामाक्षीच्या कानफटात मारले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर तिघांनी मिळून प्रकाशचा आयफोन मोबाईल फोडला. नंतर कामाक्षीने म्हापसा पोलीस स्थानकात प्रकाशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दोघांना बोलावून कडक शब्दांत समज दिली होती. त्याच्याकडून लेखी हमी घेतली. त्यानंतर प्रकाशला सोडून दिले. तेव्हापासून ती तरुणी गायब आहे.


कामाक्षीच्या भावाने ३० ऑगस्ट रोजी पर्वरी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन दिवस तपास करत आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री पोलिसांनी प्रकाशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने चक्रावणारी माहिती दिली. ‘मी कामाक्षीचा फ्लॅटवर खून करून आंबोली घाटात नेऊन जमिनीत गाडला. तिने माझ्याशी प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी सूत जुळवले होते म्हणून हे कृत्य केले’, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात अघटित घडल्याची पाल चुकचुकत आहे. अधिक तपास करण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक टीमसोबत संशयिताला घेऊन सायंकाळी आंबोलीत जाणार आहेत. त्यानंतर या घटनेतील सत्य बाहेर येईल.