मुंबई एकता कल्चर अकादमीच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रियदर्शनी पारकर प्रथम तर योगिता शेटकर द्वितीय

डिसेंबर मध्ये मुंबई गिरगाव येथे साहित्य संघात पारितोषिक वितरण
Edited by:
Published on: September 30, 2023 17:44 PM
views 195  views

कणकवली :  मुंबई एकता कल्चर अकादमी या प्रतिष्ठित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या काव्य स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातून सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात फोंडाघाट येथील कवयित्री प्रा प्रियदर्शनी पारकर यांनी प्रथम तर सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.अशी माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी दिली असून या दोघी कवयित्रींचे या यशाबद्दल सिंधुदुर्ग साहित्य चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

एकता कल्चर अकादमीतर्फे नव्या कवींना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी खुली काव्य स्पर्धा गेली 30 वर्ष आयोजित केली जात आहे. या प्रतिष्ठित अशा काव्य स्पर्धेत यावर्षी सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात महाराष्ट्र बरोबर परदेशातील मराठी कवींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या स्पर्धेत फोंडाघाट येथील कवयित्री प्रा.प्रियदर्शनी पारकर यांना 'ते तुला'  या कवितेसाठी तर अमेरिका युएसए येथील कवयित्री पल्लवी शिंदे यांना 'अपडेट' या कवितेसाठी प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.तर सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांनी आपल्या ' जाती ' या कवितेसाठी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.तसेच दहिसर मुंबई येथील कवयित्री कविता झुंजारराव यांनी 'रोजच ' या कवितेसाठी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत सुजाता घाडीगांवकर (मुंबई- करीरोड), प्रतिभा पवार  (कोथरूड पुणे), सुधाकर कांबळी (कल्याण),मिनल कांबळे (ठाणे), महेंद्र घोडिंदे (न्यू पनवेल), देवशाली पुरी (कांदिवली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली आहेत. दरम्यान डिसेंबर मध्ये चित्रपट,नाटक, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे एकता कल्चर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सदर पारितोषिक विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याचीही माहिती कवी जाधव यांनी दिली.