
कणकवली : काही दिवसापूर्वी कणकवली शहरात व ग्रामीण भागात 200 दुबार मतदार असल्याबाबतची तक्रार आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याजवळ दिली होती. कणकवली शहरात 200 दुबार मतदार असल्या बाबतची यादी आम्ही काढली. पण प्रत्यक्षात शहरात 1000 हून अधिक दुबार मतदार असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे याच बोगस मतदानावर कणकवली शहराचा नगराध्यक्ष ठरतो की काय? असा सवाल युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे.
नाईक यांनी म्हटले आहे, कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे दुबार मतदार यादी दिल्यानंतर त्यांनी सदर तक्रारयादी तहसीलदार यांच्याकडे वर्ग केली. यानंतर आम्ही कणकवली तहसीलदार यांचे लक्ष वेधले. कणकवली शहरात 200 दुबार मतदार आम्ही काढले असून 1000 हुन अधिक दुबार मतदार हे शहारात आहेत अशी माहिती दिली. यावर तहसीलदार यांनी दुबार मतदार यादीवर सर्वेक्षण करून, दुबार नावे असलेल्या व्यक्तीकडून ते दोन्ही पैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार असल्याचे लेखी पत्र त्यांच्याकडून घेण्यात येईल. तसेच दुसऱ्या ठिकाणी प्रशासनाकडून मतदान केंद्रावर कळविण्यात येईल व त्या ठिकाणची त्यांची दुबार नोंदणी रद्द कण्यात येईल. ग्रामीण व शहरी भागात दोन्ही ठिकाणी नावे असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क दिला जाईल, असे आश्वासन यावेळी तहसीलदार यांनी दिले.
तहसीलदार यांनी महत्वपूर्ण चांगली भूमिका घेतल्याने, एवढी वर्षे कणकवली शहरात बोगस पद्धतीने होत असलेल्या मतदानाला आता कुठे तरी चाप बसेल. असा विश्वास यावेळी नाईक यांनी व्यक्त केला. यापुढे कणकवली शहरात दुबार-बोगस मतदान झाल्याचे दिसून आल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडणार, असा इशारा यावेळी सुशांत नाईक यांनी दिला.










