ओबीसी जनमोर्चाचा राजेश बेंडल, अविनाश लाड यांना पाठिंबा

Edited by: मनोज पवार
Published on: November 09, 2024 18:35 PM
views 228  views

रत्नागिरी : ओबीसी जनमोर्चाने जिल्ह्यातील ओबीसी उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये गुहागरचे उमेदवार राजेश बेंडल आणि राजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांचा समावेश आहे. ओबीसी जनमोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

बावकर म्हणाले की, ही निवडणूक ओबीसींच्या अस्तित्वाची स्वाभिमानाची आहे ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना ओबीसी मतदारांची ताकद काय आहे हे दाखवून देऊ. अनेक वर्षे देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना केंद्र सरकार ती करायला तयार नाही, त्यामुळे ओबीसींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पार च्या वल्गना करणाऱ्या सरकारला ओबीसी बांधवांनी मतदानाच्या रूपाने त्यांची जागा दाखवली. महाराष्ट्र सरकार नेहमीच ओबीसी विरोधी निर्णय घेऊन ओबीसींवर अन्याय करत आहे मराठ्यांना कुणबी जातीचे बोगस दाखले देऊन मागीलधाराने ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

“सगेसोयरे”सारखे अध्यादेश काढून घटनेची पायमल्ली केली. ओबीसी महामंडळाला निधी, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण, जातनिहाय जनगणना यांसारख्या अनेक मागण्यांबाबत निवेदन आंदोलन मोर्चा काढून सुद्धा सरकार निष्क्रिय राहिले किंबहुना ओबीसींना दुर्लक्षित केले. आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक पक्षांमध्ये निष्ठेने काम करणाऱ्या ओबीसी इच्छुक उमेदवारांना डावलले गेल्याचा आरोपही बावकर यांनी केला. पत्रकार परिषदेला ओबीसी जनमोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, दीपक राऊत, काका तोडणकर उपस्थित होते.