
सावंतवाडी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला. या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हा निर्णय घेताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर झोपले होते का? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज का उठविला नाही असा सवाल ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्यांवर पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. यापुढे शेतकरी गरजेपुरते झाड तोडू शकणार नाहीत. तसेच यामुळे वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराचा मार्ग खुला होणार आहे. यातून ब्लॅकमेलिंग होऊन शेतकऱ्यांना नडले जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध होणे आवश्यक होते. या संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन विरोध करण्यात आला. मात्र या मतदारसंघाचे स्थानिक आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांची भूमिका विधानसभेत का मांडली नाही. केसरकर यांनी शेतकऱ्यांना आणि येथील जनतेला वारंवार वाऱ्यावर सोडले आहे. त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे मतदार संघातील जनतेचे प्रश्न दिसत नसल्यामुळे या निष्क्रिय आमदाराला घरी बसविण्याची हीच संधी आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी अगोदर त्रस्त आहेत त्यात हा निर्णय घेण्यात आला. या वृक्षांची तोड झाल्यास एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे या संदर्भात शेतकर्यांच्या बाजूने आवाज उठविण्याची. गरज असताना केसरकरांनी केले काय असे सवाल करत केसकर निष्क्रिय आमदार असल्याची टीका त्यांनी केलीय.