सावंतवाडी : गणेशोत्सवा निमित्त लाखो कोकणवासीय कोकणात दाखल होत आहेत. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून गणेश भक्तांना कोकणात जाण्यासाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बसेस कोकणात सोडण्यात आल्यात. तसेच शासनाच्या माध्यमातून स्पेशल रेल्वे देखील कोकणात सोडल्या गेल्यात. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामासह सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागते त्याबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारलं असता, बसेसची यंदा मोठ्या प्रमाणात व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्यावतीने केली. काही लोक राहिले होते त्यांचीही व्यवस्था केली आहे. तर सावंतवाडी रेल्वे स्थानका संदर्भात लवकरच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली. तर हे सरकार सर्वसामान्यांच सरकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला न्याय दिला जाईल, सर्व प्रश्न मार्गी लागतील असं मत शिक्षणमंत्री यांनी व्यक्त केले. सावंतावडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ज्या कोकणानं मला जन्म दिला त्या कोकणवासीयांसह सिंधुदुर्ग जिल्हावासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, हा मंगलमय प्रसंग आपल्या जीवनात सुख, समृद्धी अन् भरभराट घेऊन येवो अखंड वैभव सर्वांना प्राप्त होवो. विद्येच्या दैवतानं विद्यार्थांना चांगली बुद्धीमत्ता देवो त्यांची प्रगती घडो अशी प्रार्थना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गणराया चरणी केली. तर उद्या गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे घरी गणपतीची पुजा करून नंतर सार्वजनिक गणपतीची पुजा करणार आहे. मुंबई, कोल्हापूरला देखील गणेशोत्सव मंडळांना भेट देत गणरायाची सेवा करणार आहे. आपली माणसं या उत्सवात भेटतात याचा आनंद असतो. दरवर्षी प्रमाणे प्रत्येकाच्या घरी जावं अशी इच्छा आहे. जेवढ्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी पोहचून गणरायाचे आशीर्वाद घेणार असल्याचे मत व्यक्त करत दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात येणार आहेत. भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा येण ही मोठी घटना असून याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. छत्रपतींच्या नावानं आपलं राज्य चालत. शिवाजी महाराजांचा पुतळा हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारला जाणार आहे. भव्यदिव्य पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. नौदल दिन हा पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे हा क्षण जिल्हावासियांची मान अभिमानानं उंचावणारा आहे अस मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.