
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे , रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत 'विद्वत्तेचा सन्मान समारंभ' हा कार्यक्रम संपन्न झाला. हाॅटेल अतिथी बांबू येथे रविवार, ०६ जुलै रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंचावर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रसंत श्री. पाचलेगावकर महाराजांचे परमभक्त श्री. श्रीकांत सावंत, डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे, सुयोग पंडित, माजी जि. प. अध्यक्ष सरोज परब तसेच हाॅटेल व्यावसायिक संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
समारंभाच्या सुरुवातीला मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले आणि सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून त्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी बोलताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत म्हणाले की, ह्या समारंभाच्या माध्यमातून आम्ही विद्वत्तेचा सन्मान करत आहोत. सत्कारमूर्तींनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उचित योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपणे अपेक्षित आहे व त्यासाठी नेहमीच सदिच्छा आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे म्हणाले की तळागाळातील मुलांचे यश ही आजच्या काळाची गरज आहे. आपण त्यासाठी निमित्त ठरतोय ह्याचा आनंद बाळगत काम करत रहावे. यावेळी सरोज परब यांनी कारकिर्दीतील विविध टप्प्यावर 'संयम' ह्या घटकाची महती स्वानुभवावरुन विशद केली. व्यावसायिक संजय गावडे यांनी मार्गदर्शन करताना न्यूनगंडावर मात करत चिकाटी ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना सुयोग पंडित म्हणाले की, ह्या कार्यक्रमाची विद्वानांचा सत्कार अशी संकल्पना नसून तो 'विद्वत्तेचा सत्कार' असा आशय आहे. त्यामुळे समाजात व्यक्तींपेक्षा तत्वांना अधिक महत्व आहे असा संदेश रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी दिला आहे. तो संदेश सर्वांसाठीच पूरक व पोषक ठरेल. 'मी पण' बाजुला ठेवलं गेलं तर विद्येचा, कौशल्याचा व विद्वत्तेचा समाजाला उपयोग होऊ शकतो. उपयुक्त विद्वत्ता ही कौशल्य आणि श्रमांचे महत्व तसेच श्रमांचा आदर करणारी असते असेही सुयोग पंडित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले
या कार्यक्रमात, एल. एल. बी. च्या अंतिम वर्षात, व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ येथून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सहिष्णू सुयोग पंडित, एम बी बी एस प्रवेशाच्या 'नीट' परीक्षेत देशात १२.०७९ वे स्थान प्राप्त केलेल्या विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासह सौ. पूनम नागेश चव्हाण ( एल. एल बी.), ऐश्वर्य मांजरेकर ( एल एल. बी.) , आद्या नागवेकर ( एल. एल. बी.), रत्नदीप कदम ( एल. एल. बी.) यांचे सुयश आणि इयत्ता दहावीच्या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कु. समृद्धी मांजरेकर व कु. सिद्धी मांजरेकर या जुळ्या बहिणींसह कु. यश संजय गावडे याचे दहाव्वी परीक्षेतील विशेष सुयश यासाठी सत्कार करण्यात आला. श्रीकांत सावंत यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कारमूर्तींना गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह डॉ. वीणा मेहेंदळे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. फिलोमिना पंडित, व्यावसायिक श्री. संतोष नागवेकर तसेच हाॅटेल अतिथी बांबू व्यवस्थापन, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.