
मालवण : शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. ही घटना आज पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, महादेव घागरे यांनी भेट देत माहिती घेतली. अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी - शहरातील मेढा जोशी वाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय - २९), सचिन सुभाष केळुसकर (वय - ४२), जितेश विजय वाघ (वय - ३५) हे तीन मच्छीमार आज सकाळी मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. या तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. या अपघातात कीर्तीदा तारी व सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहत पोहोचले. मात्र जितेश वाघ हा समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने त्याचा समुद्रात शोध सुरू आहे.
आज दिनांक 8/7/2025 रोजी मालवण मेढा जोशी वाडा येथील मच्छीमार ,कीर्तीदा लीलाधर तारी ( वय -29 ), सचिन सुभाष केळूसकर ( वय 42 ) , जितेश विजय वाघ, ( वय-35) असे सकाळी 06.00 वाजताच्या सुमारास मेढा येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांची छोटी मासेमारी बोट जोराचा वारा व मोठ्या लाटा यामुळे पलटी होऊन अपघात होऊन तिघेही पाण्यात पडले.
अपघातामध्ये बोटी मधील जितेश विजय वाघ वय 35 वर्षे हा समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झालेला आहे. सदर अपघातातील मासेमारी बोट किनाऱ्यावर आणलेली असून बेपत्ता जितेश विजय वाघ याचा स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध सुरू आहे.