मालवण : मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कातवड, नांदरुख साळकुंभा, कातवड- नांदरुख या दोन प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत असलेल्या या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मागील चार-पाच वर्षात या रस्त्यांची कोणतीही दुरुस्ती न झाल्याने वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. लवकरात लवकर काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा कातवड, नांदरुख, साळकुंभा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कातवड, नांदरुख साळकुंभा, कातवड- नांदरुख हे रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आले होते. आज या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या विभागाने गेली चार पाच वर्षे या रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. नांदरुख सरपंच रामचंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक झाली. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. लवकरात लवकर हा रस्ता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.