
सावंतवाडी : येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत मंजूर असलेल्या चौकुळ मळववाडी ते चूरणीची मुस रस्त्याच्या रखडलेल्या कामाप्रश्नी तसेच त्या भागातील रस्ते, पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी चौकुळ ग्रामस्थांनी सोमवारी सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन पुकारले. यावेळी कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी या भागातील प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने सुरु करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसात पुलाचे तसेच रस्त्याची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तर उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांनी चौकुळ चूरणीची मुस येथील पाच किमीपैकी तीन किमी रस्ता संदर्भात आपणाकडे प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली आहे.
मंगळवारी त्या ठिकाणी जाऊन सर्व्हे केल्यानंतर ना हरकत दाखला देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. दोन्ही विभागांनी तसे लेखी आश्वासन दिल्यामुळे हे ठिय्या आंदोलन चौकुळ ग्रामस्थांनी स्थगित केले.
दरम्यान या आंदोलनाला भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, पंढरीनाथ राऊळ यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करीत आंदोलनाला पाठिंबा दिला.दरम्यान या आंदोलनाला विशेष करून सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी पाठिंबा दिला.
चौकुळ भागातील सतरा किमीच्या हद्दीतील मंजूर तीन रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यातील भावई मंदिराकडील पुलाचे कामही पूर्ण करण्यात आले नाही. त्या प्रश्नीदेखील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, सरपंच सरेश शेटवे, माजी सरपंच गुलाबराव गावडे, बाळा गावडे, संजू गावडे, पांडुरंग गावडे, सुरेश गावडे, बापू गावडे, गंगाराम गावडे, सुभाष गावडे, संजीव गावडे, संतोष गावडे, शशिकांत गावडे, भरत गावडे, दिनेश गावडे, तर चौकुळ चूरणीची मुस वं बेरडकी येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पीएमजेएसवायचे कुडाळ येथील अधिकारी, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडगे, वनकर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास २६ जानेवारी रोजी मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा गुलाबराव गावडे यांनी दिला आहे.