
सिंधुदुर्ग : औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये तब्बल ₹२ लाख ५५ हजार १६० तर २०२२-२३ (नोव्हेंबरपर्यंत) २ लाख ६२६ रू. खर्च करण्यात आला. आतापर्यंत ६.५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ २५० रू. इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातो अशी माहिती देत, औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीन केली आहे.
दरम्यान, ही गोष्ट अत्यंत संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जात आहे. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले, अशा औरंगजेबासाठी हा खर्च करणे योग्य आहे का? असा सवाल हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी ही मदत तातडीने थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. सरकारने त्वरित यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा असेही समितीने म्हटले आहे.