सावंतवाडी : वृत्तबद्ध कविता लिहिणे अत्यंत सोपे आहे त्यासाठी आपण वास्तवाचे भान राखायला हवे, आता वृत्तबद्ध कविता अनेक गझल कार्यशाळेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांची पुढील दोन महिन्यात व्हाट्सअपवर कार्यशाळा घेतली जाईल आणि यातून तुम्ही निश्चितपणे कवी म्हणून तुमच्या कविता लिहिण्यास तरबेज व्हाल असे मत वृत्तबद्ध कविता व गझलचे प्रशिक्षक डोंबवली येथील कवी विजय जोशी उर्फ विजो यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे रविवारी 14 मे रोजी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे एक दिवसीय वृत्तबद्ध कविता व गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे दीपप्रज्वल करून उद्घाटन श्री. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य यशोधन गवस, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, ॲड नकुल पार्सेकर, रामदास पारकर, कार्यशाळेचे संयोजक कवी दीपक पटेकर, मेघना राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री जोशी पुढे म्हणाले, खरंतर वृत्तबद्ध कविता लिहिणे तसेच सोपे काम नाही. पण आपण ते सोपं करू शकतो त्यासाठी आपल्याला भाषेवर प्रभुत्व हवे, भाषा अवगत असायला हवी तर सहजपणे आपण वृत्तबद्ध कविता लिहू शकतो. त्यासाठी मात्रा, वृत्त अक्षर गणवृत्ताबाबत ज्ञान हवे असे ते म्हणाले. आपण ऑनलाइन कार्यशाळा घेणार आहोत त्या माध्यमातून कसे लिहिता येईल हे शिकवले जाईल आणि त्यातून निश्चितच तुम्ही कविता लिहू शकाल. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांनी वृत्तबद्ध कविता आणि गझल कार्यशाळा घेतली खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ रुजवण्याचे काम ही शाखा करत आहे या शाखेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. यातून कविता आणि लेखक घडवण्याचे काम केले जात आहे असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य यशोधन गवस म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांनी ही कार्यशाळा घेऊन निश्चितच चांगले काम केले आहे. विजय जोशी यांनी पुन्हा या भागात यावे आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील. यावेळी प्रास्ताविक ॲड संतोष सावंत यांनी करताना ही कार्यशाळा घेण्यास कवी दीपक पटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यशाळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच गोवा मडगाव आदी भागातून साहित्यिकांनी सहभाग दर्शवला. दरवर्षी आम्ही नवोदित कवी घडवण्याच्या दृष्टीने अशी चळवळ उभारली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ॲड नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, रामदास पारकर आदींनी आपले विचार मांडले. अशा वृत्तबद्ध कविता व गझल कार्यशाळेतून नवोदित कवी घडण्याचे काम होणारच आहे पण यातून आम्हाला चांगले शिकता आले असा उपक्रम सातत्याने घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ, आभार सचिव प्रतिभा चव्हाण, अभिमन्यू लोंढे यांनी मानले. समारोप कार्यक्रमांमध्ये इतिहासकार जी ए बुवा यांच्या माध्यमातून या कार्यशाळेत ज्यांनी सहभाग घेतला त्यांची कविता लेखन स्पर्धा तीन महिन्यानंतर घेतली जाईल त्याला पारितोषिक देण्यात येईल व त्यांचा सन्मान केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने चैताली चौकेकर,उज्वला कर्पे,देवयानी आजगावकर,अमीर सातार्डेकर,आश्लेषा पारकर,आदिती मसुरकर,राधिका कांबळी,मेघना राऊळ,स्नेहा नारिंगणेकर,अलका कांबळे,राजेंद्र गोसावी,रामदास पारकर,रितेश राऊळ,डॉ.गौरी गणपत्ये, कृष्णा गवस,दिलीप भाईप,सौ.चव्हाण,उज्वल सावंत
मधुकांत कद्रेकर आदी कवी उपस्थित होते.