
कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले गावामध्ये कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय,भारत सरकार आयोजित विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली व ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित शेती आणि समृद्ध किसान याविषयी जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाला आंदुर्ले गावातील शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २९ मे ते १२ जून या कालावधीत 'विकसित कृषी संकल्प अभियान' ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश शास्त्रज्ञांचे अद्ययावत संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच त्यांना मातीतील पोषक तत्वे, खतांचा योग्य वापर आणि शेतीच्या विविध पैलूंबाबत जागरूक करणे हा आहे.
या महत्त्वाच्या जनजागृती कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ञ व्याख्याते उपस्थित होते, ज्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत मुंबई मत्स्य संवर्धन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण रसाळ, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील प्राध्यापक डॉ. दळवी, कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस येथील शास्त्रज्ञ डॉ. देसाई आणि डॉ. धामापूरकर, तसेच उपकृषी अधिकारी श्रीमती. कविटकर यांचा समावेश होता.
डॉ. किरण रसाळ यांनी 'विकसित कृषी संकल्प अभियाना'चा उद्देश व संकल्पना स्पष्ट केली. तसेच, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवस्थापन व संवर्धनाचे फायदे सविस्तरपणे सांगितले. डॉ. दळवी यांनी पशुसंवर्धन विभागातील विविध संधींवर प्रकाश टाकत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. धामापूरकर यांनी मृदाशास्त्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शाश्वत उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मातीच्या आरोग्याचे ज्ञान घेणे आणि रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर टाळून जमिनीचे आरोग्य जपण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले. डॉ. देसाई यांनी कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांना या प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्रीमती. कविटकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती सादर केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.
आंदुर्ले गावचे सरपंच अक्षय तेंडोलकर यांनी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. गावातील सर्व शेतकरी बांधवांनी मातीच्या आरोग्याबाबत सजग होऊन जमीन आरोग्य पत्रिका (Soil Health Card) काढून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकिसन मोर्ये, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा पेडणेकर, माजी सरपंच आरती पाटील, सदानंद सर्वेकर, सतिश राऊळ, अनिल भगत, प्रसाद सर्वेकर, अंजनी पाटकर,,स्मिता पिंगुळकर, अनुराधा साळगावकर, सुप्रिया येरम, सोसायटी संचालक प्रसाद गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह सुमारे ५० शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन कृषि सहाय्यक श्री. सोमकांत आईर आणि ग्रामपंचायत आंदुर्ले यांनी केले. 'विकसित कृषि संकल्प अभियाना'मुळे आंदुर्ले गावातील शेतकरी अधिक सक्षम होऊन समृद्धीकडे वाटचाल करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.