बीएसएनएल टॉवर कार्यान्वित न केल्यास उपोषण

वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर यांचा इशारा
Edited by: दिपेश परब
Published on: March 17, 2025 18:50 PM
views 43  views

वेंगुर्ला : तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हरिचरणगिरी तिठा आवेरा याठिकाणी उभारण्यात आलेल्या बीएसएनएल कंपनीचा टॉवर त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर यांनी निवेदनाद्वारे बीएसएनएल जिल्हा प्रबंधक कार्यालय सावंतवाडी यांच्याकडे केली आहे. 

हरिचरणगिरी तिठा आवेरा याठिकाणी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला असून टॉवर मागील ७ ते ८ महिन्यापूर्वी पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापपर्यंत टॉवर कार्यान्वित करण्यासाठी यंत्रसामग्री आस्थापित केली नसल्यामुळे टॉवर कार्यान्वित होऊ शकला नाही. हा टॉवर ज्या जागी बांधण्यात आला आहे त्याच्या आसपास अन्य कोणत्याही मोबाईल कंपनीचा नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात हा टॉवर कार्यान्वित न केल्यास वायंगणी ग्रामस्थांसमवेत आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर यांनी दिला आहे.