
राजापूरः स्थानिक जनतेने रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्याने या प्रकल्पाऐवजी पर्यावरणपूरक दोन मोठे उद्योग आणून येथील युवक-युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवणे यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी आपला वचननामा जाहीर करतांना घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमुद केले. श्री. सामंत यांच्या या भूमिकेमुळे रिफायनरीचा मुद्दाच संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. निष्ठा ही मतदारसंघातील जनतेशी व त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत विकासाच्या आशेने दाखवलेल्या विश्वासाप्रती हवी होती मात्र ती राजकीय असेल तर मतदार असलेल्या जनतेला त्याचा फायदा काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आता पर्यावरणपूरक उद्योगांसह स्वतःच्या पायाभूत विकासासाठी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत तरी निदान राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ स्वतःहून सिध्द झालेला आहे का हे पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे. निष्ठा ही राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासाशी निगडीत हवी. ती पाहता गेल्या पंधरा वर्षांत या मतदारसंघातील जनतेच्या दैनंदिन जीवनमानात काही फरक पडलेला असेल तर विचार करण्याची ही संधी येथील सुज्ञ मतदारांना आलेली आहे. राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघ सतत भावनेच्या राजकारणावर स्वार होऊन स्वतःसह अनेक पिढ्यांचे नुकसान करतो याचे प्रत्यंतर आलेले असताना येथील ओस पडत चाललेली गावे-बाजारपेठांच्या प्रश्नासह स्थानिक जनतेच्या शिक्षण व्यवस्था, आरोग्यसेवा आणि रस्ते पाण्यासह सर्वच पायाभूत सुविधांची असलेली दुरवस्था बघून महायुती शासनाने शेकडो कोटींचा निधी दिला आहे. दुर्देव म्हणजे अशी दुरवस्था पाहून हा निधी दिला म्हणून स्थानिक आमदारांची एकाच मतदारसंघात किंबहुना आपल्याच मतदारसंघात अधिक निधी दिला म्हणून देखील भावनिक तक्रार आहे. त्यामुळे यांची निष्ठा मतदारसंघाशी आहे की फक्त राजकीय आहे ? असा सवाल श्री. किरण सामंत यांनी उपस्थित केला.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांची वानवा आहेच शिवाय आरोग्याच्या सेवेबाबत तर येथील जनता रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, मुंबईवर अवलंबून आहे. यासाठी विद्यमान महायुती शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजितदादा पवार यांनी ओणी येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय खास बाब म्हणून मंजूर केले आहे. यासाठी आपला सततचा पाठपुरावा सुरू होता. महाविकास आघाडी शासनाच्या काळात राज्यात विभागात एक मल्टीस्पेशालिटी रूग्णालय असे धोरण पुढे करून तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा प्रस्ताव लाल फितीत गुंडाळून ठेवला होता त्यावेळी निदान उपजिल्हा रूग्णालय तरी मंजूर करा अशी विनवणी राजन साळवी करीत होते याकडे किरण सामंत यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आगामी काळात असे सुसज्ज रुग्णालय राजापूरकरांना हवे असणारच असा दावा त्यांनी केला.
केवळ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयच नव्हे तर राजापूर लांजात प्रगत शिक्षणाच्या सोयीसुविधांचा आजही अभाव आहे. या दोन्ही तालुक्यांना आधुनिक विकासाची आज गरज असताना केवळ भावनिक राजकारण करून अधांतरी ठेवण्यात आले आहे. यामध्ये एका पिढीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. स्थानिक पातळीवर चांगले शिक्षण नाही आणि रोजगारही नाही म्हणून तालुका ओस पडत चालला आहे. ग्रामीण भागांतील घरांत केवळ वृध्द व्यक्तींचा वावर आहे. मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे शहरासह ग्रामीण बाजारपेठांतही मोठा शुकशुकाट आहे. ही दयनीय अवस्था का आली याचा विचार करताना दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा अभाव याशिवाय दुसरे कारण शोधून सापडत नाही. आपल्या आयुष्यातील पंधरा वर्षांचा काळ अशा पध्दतीने व्यथित झालेला असताना अजून पाच वर्षे आपण जर हेच भोगत राहिलो तर येथील नव्या पिढीच्या आयुष्याचे, भवितव्याचे काय ? असा प्रश्न निर्माण झाल्याचे श्री. सामंत म्हणाले.
इंजिनियर झाल्यानंतर सन १९९६ साली माझ्या उद्योग व्यवसायाची सुरूवात मी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातूनच केलेली आहे. त्यामुळे गेली २५ वर्षे माझी नाळ या मतदारसंघाशी आणि येथील जनतेशी, संस्थांशी जुळलेली आहे. त्यामुळेच येथील जनतेशी निर्माण झालेले पारिवारिक नाते मी ऋणानुबंधाने जपले आहे. या मतदारसंघाने ज्या उमेदवाराला तीनवेळा संधी देऊन आपल्या आयुष्यातील महत्वाच्या कालावधीची संधी दिली त्याचे फलित म्हणून येथील जनतेच्या दैनंदिन जीवनमानात काय फरक पडला आहे याचा विचार न केल्यास तो पुन्हा आत्मघात ठरणार आहे असे सामंत म्हणाले.
आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काम मी प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. ती व्यक्ती कोणाकडून आली आहे किंवा कोणत्या पक्षाची आहे असा विचार कधीच नसतो. मात्र नाव किरण असले तरी प्रकाशझोतात राहणे मला कधी जमलेले नाही. एकदा शब्द दिला की काम करायचं एवढेच मला माहित आहे. मतदारसंघ फिरताना हे लक्षात आले की विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ कोसो दूर आहे. त्यामुळे येथे एका हक्काच्या आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीची गरज असल्याचे आपल्या लक्षात आले. केवळ यासाठीच आपली उमेदवारी आहे असे श्री. सामंत यांनी सांगीतले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत आज महिलांना पंधराशे रूपयांचे अर्थसहाय्य, अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन सिलेंडर मोफत, महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत, महिला बचत गटांना दुपटीने अर्थसहाय्य, महिलांना आयटी, टुरिझम क्षेत्रात प्राधान्य, मुलींच्या उज्वल भविष्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना असे अनेक क्रांतीकारक निर्णय महायुती शासनाने घेतले आहेत याचा उल्लेख करून श्री. सामंत म्हणाले की, राज्यात पुन्हा भाजपा-महायुतीचे सरकार येणार असल्याने त्यामध्ये राजापूर- लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील आपल्यासारख्या एका आमदाराचा समावेश असावा यासाठी येथील स्थानिक जनतेनेच ही निवडणूक हाती घेऊन आपले मनोबल वाढवलेले आहे.
विरोधकांच्या प्रचार रणनितीवर बोलताना त्यांनी सांगीतले की, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर मुस्लिम बांधवांचाही आपणाला मोठा पाठींबा मिळत आहे. मात्र काही ठिकाणी नाहक गैरसमज पसरवून पराभवाच्या भीतीतून केविलवाणा प्रचार केला जात आहे. मात्र सामंत परिवाराचा इतिहास सर्वज्ञात असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा परिवार म्हणून जिल्ह्यात सामंत कुटुंबियांची ओळख आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विखारी प्रचारातून काहीच निष्पन्न होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अशाच पध्दतीने न होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा उकरून काढून पुन्हापुन्हा पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मतदारसंघाचे दुर्देव म्हणजे हा प्रकल्प येथे आणण्याचा प्रयत्न केला ते उबाठा शिवसेनेवालेच त्याचे समर्थन करतात, मध्येच विरोध करू लागले व येथील जनतेला वारंवार या मुद्द्याचे भय दाखवून मते मिळवत राहिले. त्यांची निष्ठा बदलती होती. मात्र आपण पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, हाच नव्हे तर कोणताही प्रकल्प स्थानिकांच्या इच्छेविरोधात येथे येणार नाही. मात्र आपल्या पुढाकारातून लवकरच दोन पर्यावरणपूरक प्रकल्प राजापूर मतदारसंघात येऊ घातले आहेत. त्या प्रकल्पातून आपण विकासाचा व मागासलेपण दूर करण्याचा श्रीगणेशा करूया असे सांगून श्री. किरण सामंत यांनी पत्रकार परिषद संपवली.