नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 09, 2026 18:17 PM
views 18  views

कणकवली : हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.  त्यामुळे नुकसानग्रस्त आंबा व काजू  शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई जाहीर करावी अशी निवेदनाद्वारे मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन केली आहे. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत मदत व पुनर्वसन विभागाला कार्यवाही करण्यास ना. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.  

वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार तसेच संबधित व्यापारी वर्ग सध्या अत्यंत गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीड – रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील दरात होत असेलेली मोठी घसरण व अनिश्चितता यामुळे शेतकरी आणि व्यापारी अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामध्ये बाधित आंबा व काजू बागायतदारांना तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई जाहीर करावी.आंबा व काजू पिकासाठी घेतलेली सर्व कर्जे गोठवून कर्जमाफी योजनेत स्पष्ट समावेश करावा.औषधे व खतांच्या दरांवर नियंत्रण ठेऊन बनावट कंपन्यांवर कठोर कारवाई करावी.उसाप्रमाणे आंबा व काजू पिकांसाठी जास्तीत जास्त हमीभाव मिळावा अशा आंबा व काजू  शेतकऱ्यांच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.