
कणकवली: जुने भाजीमार्केट येथे असलेले न.पं.च्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरु आहे. हे काम करत असताना पर्यायी स्वच्छतागृहाची व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी न.पं.च्या सत्ताधाऱ्यांवर कणकवली न.पं.चे फिरते स्वच्छतागृह फिरतच राहिले,अशी टीका केली आहे. दरम्यान, स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरु असल्यामुळे सोनगेवाडीत दुर्गंधी पसरली आहे.
पटवर्धन चौकनजीक असलेल्या जुन्या भाजी मार्केट असलेला न.पं.च्या स्वच्छतागृहातील शौचालय व बाथरुमचे तोडकाम सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठेतील
सर्व व्यापारी वर्ग व कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. हे बांधकाम सुरु करण्यापूर्वी फिरते स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे गरजेचे असताना देखील ती न.पं.प्रशासाकडून केली गेली नसल्यामुळे विक्रेते,फिरते व्यापारी व नागरिकांची स्वच्छतागृहा अभावी कुंचबना होत आहे. नवीन स्वच्छतागृह उभारणीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून या कालावधीत कणकवलीतील व्यापारी आणि नागरिक यांनी जायचे कुठे? याचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे, असे सुजित जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.