
कणकवली : महाबोधी महाविहार मुक्त व्हावे व १९४९ चा टेम्पल कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी महाबोधी महाविहार आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र आणि दी बुद्धिस्ट फेडरेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० यावेळेत येथील बुद्धविहार येथे महाबोधी महाविहार मुक्त परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला दिल्ली येथील भंते विनायार्च हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मुख्य समन्वयक राजेश पवार, रवींद्र हिरोळे, सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिषदेसाठी गोवा व सिंधुदुर्गातून १००० हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दी बुद्धीस्ट फेडरेशन आॅफ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्यामसुदर जाधव यांनी दिली.
येथील बुद्धविहार आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. जाधव बोलत होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डे, दी बुद्धीस्ट फेडरेशन आॅफ सिंधुदुर्ग पदाधिकारी संदीप कदम, अंकुश कदम, अॅड. सुदीप कांबळे, संजय कदम, लुकेश कांबळे हे उपस्थित होते.
जाधव म्हणाले, तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते पवित्र स्थळ म्हणजे बिहारमधील बोधगयचे महाविहार. हे पवित्र स्थळ जगभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, या श्रद्धास्थानाचे पावित्र्य आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. १९४९ च्या बोधगया मंदिर कायद्यातील बौद्ध विरोधी तरतुदीने महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन शैव पंथीय हिंदूंच्या ताब्यात देण्यात आले आहे. जगभराच्या बौद्धांसाठी पवित्र स्थान असलेल्या बिहारमधील महाबोधी महाविहारावर होणारे हे ब्राह्मणी आक्रमण रोखण्यासाठी भारतासहीत जगभरातील बौद्ध बांधव संघटितपणे लढा देत आहेत. १९४९ चा अन्ययाकारक बोधगया टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहाराचे पावित्र्य व व्यवस्थापन पूर्ण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही मागणी घेऊन महा महाबोधी महाविहार मुक्त व्हावे व १९४९ चा टेम्पल कायदा रद्द व्हावा या मागणीसाठीविहार मुक्त आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील बौद्ध बांधव शांतनेने आंदोलन करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी २८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महाबोधी महाविहार मुक्तीची मागणी केली होती. महाबोधी महाविहार मुक्त व्हावे व १९४९ चा टेपल कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी २०२६ मध्ये देशभरातील बौद्ध बांधव संसदेबाहेर आंदोलन करणार आहेत. त्यानंतर मे २०२६ मधील बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देशभरातील बौद्ध बांधव बिहार येथील महाबोधी महाविहार एकत्रित होणार आहे. या आंदोलनात सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कणकवलीतील महाबोधी महाविहार मुक्ती परिषदेला दिल्लीतील भंते विनाचार्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दी बुद्धिस्ट फेडेशनचे मुख्य समन्वयक राजेश पवार, रवींद्र हिरोळे, सुभाष जाधव, सुमेध किरवले, अॅड. राहुल किरवले, अॅड. राहुल लहासे, प्रकाश कांबळे, गोव्यातील मिलिंद भाटे, अशोक खावणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बौद्ध समाजातील ३० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून गोवा राज्य व सिंधुदुर्गातील १००० हून अधिक लोक उपस्थित राहणार आहे. या परिषदेला बौद्ध समाजातील बांधवांसह इतर समाजातील बांधवांनी उपस्थित राहून दी बुद्धिस्ट फेडरेशने उभारलेल्या महाबोधी महाविकार मुक्तीच्या लढयात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले. ही परिषद घेण्यामागील उद्देश अकुंश जाधव यांनी सांगितला.











