
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या शहर विकास आघाडी वगैरे चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात वेगळा ट्विस्ट आणला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे कणकवलीतील प्रमुख पदाधिकारी तडकाफडकी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य शहर विकास आघाडीबाबत काय निर्णय होतो, याची उत्सुकता आता कणकवलीकरण लागू राहिली आहे.
उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासहित ठाकरे शिवसेनेचे कणकवलीतील प्रमुख नेते हे तडकाफडकी मुंबई मध्ये दाखल झाले असून त्यांची आज उद्धव ठाकरेंनी बरोबर कणकवलीतील निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. कणकवलीत संभाव्य अशा 'त्या' युतीला उद्धव ठाकरे संमती देणार का? हेपाहणे महत्त्वाचे असणार आहे. एकीकडे भाजपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले. पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीच्या मेळाव्यात तसे स्पष्टपणे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश देत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जर भाजपा स्वबळावर लढत असेल तर आमची देखील स्वबळावर लढण्याची तयारी असेल असे सूतोवाच राज्याचे उद्योग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी जाहीर केले.
दरम्यान, काल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांना स्वबळाच्या भूमिकेबाबत सल्ला दिलेला असतानाच कणकवली जर ठाकरे व शिंदे शिवसेनेची युती झाली तर दोन्ही जिल्ह्यात शिंदे शिवसेनेशी संबंध तोडू असा निर्वाणीचा इशारा दिला व त्यानंतर अवघ्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा भागातील दौऱ्या दरम्यान शिंदे शिवसेनेशी युती करू नका असे स्पष्ट आदेश दिले होते. असे आदेश दिल्यानंतर काही तास उलटतात तोच कणकवलीत शिंदे व ठाकरे सेनेचे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याची समीकरणे चर्चेत येऊ लागली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काल एका मुलाखती दरम्यान पत्रकारांनी हा प्रश्न विचारला व अशी युती केली जाणार का? किंवा या युतीला तुमची संमती आहे का? असा प्रश्न उपस्थित करताच उद्धव ठाकरे यांनी मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो मग त्यानंतरच या विषयावर बोलतो असे स्पष्ट केले. व त्यानंतर लागलीच ठाकरे शिवसेनेच्या कणकवली नगरपंचायत शी संबंधित असणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी मुंबईला बोलावून घेण्यात आल्याचे समजते.
संपूर्ण प्रक्रियेत माजी आमदार वैभव नाईक यांची भूमिका महत्वाची असणार आहे. कारण अशा प्रकारे जर युती झाली शहर विकास आघाडीबरोबर शिंदे व ठाकरे शिवसेना एकत्र आली तर कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक यांची काय भूमिका असणार? ठाकरे व शिंदे शिवसेना कुडाळ मध्ये एकत्र येण्याची शक्यता फार कमी असताना माजी आमदार वैभव नाईक यांनी या साऱ्या घडामोडींमध्ये सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.










