LIVE UPDATES

आर्थिक दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य अधिक घातक : प्राचार्य युवराज महालिंगे

कणकवली महाविद्यालयात राजर्षी शाहूं महाराजांना अभिवादन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 27, 2025 18:09 PM
views 31  views

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे, कणकवली कॉलेज कणकवली येथे सांस्कृतिक विभाग व  आय.क्यू.ए.सी. विभाग आयोजित  छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे , प्रमुख व्याख्याते प्रा.मीना महाडेश्वर, ज्यूनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.महादेव माने,शाहीर प्रा.हरीभाऊ भिसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सीमा हडकर व प्रा.विजय सावंत उपस्थित होते.

"शाहू महाराजाचे विचार हे समाजाला दिशा देणारे आहेत.त्यांच्या विचारात स्त्री- पुरूष समानता होती.आपला समाज हा महापुरुषांच्या विचारांवर वाटचाल करणारा असल्याने विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजाचे विचार मनात- ध्यानात रूजविले पाहिजेत.आर्थिक दारिद्र्य असण्यापेक्षा विचारांचे दारिद्र्य अधिक घातक असते" असे प्रतिपादन प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले.पुढे ते म्हणाले की, महामानवाच्या जयंती, शाहू महारांजाचे कार्य जितक्या वेगाने समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे तितकेचं त्यांचे विचार पोहाचायला पाहिजेत असे सांगून त्यांनी सांस्कृतिक विभागाच्या वर्षभर होणा-या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख व्याख्यात्या प्रा.मीना महाडेश्वर यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समग्र कार्याचा वेध घेतला.त्यांचे शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला विषयक विचार आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.त्यांच्या  प्रेरणादायी विचारांतून नव्या शैक्षणिक धोरणाची घडी बसविली जात आहे.मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षण, मूल्यांची जोपासना, मुलींसाठी मोफत शिक्षण, व्यावसायिक शिक्षण असे त्यांचे विचार होते तेच विचार आजच्या शैक्षणिक धोरणांमध्ये आहेत" असे मत व्यक्त केले.

पर्यवेक्षक प्रा.महादेव माने यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक , शैक्षणिक विचारांचे महत्त्व विशद केले.प्रा.हरीभाऊ भिसे यांनीही शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.तसेच सांस्कृतिक जिल्हा समन्वयक प्रा. डॉ.आशिष नाईक यांनीही शाहू महाराजांच्या विचारांचे महत्त्व सांगून सांस्कृतिक विभागातील कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून  लोकशाहीर प्रा.हरीभाऊ भिसे यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाद्वारे सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पायल डिचोलकर, प्रास्ताविक प्रा.सीमा हडकर व आभार प्रदर्शन प्रा.विजय सावंत यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सिनियर, ज्यूनिअर सांस्कृतिक विभागातील सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.