२०२९ पर्यंत सिंधुदुर्ग विकासामध्ये राज्यात पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये असेल : नितेश राणे

हा वाढदिवस वेगळा, कारण कणकवली पुन्हा एकदा राजकारणाची केंद्रबिंदू बनली
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 23, 2025 20:51 PM
views 87  views

कणकवली : यावर्षीचा वाढदिवस खरेच वेगळा होता. कारण, आपली कणकवली पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाची केंद्रबिंदू बनली आहे. तुम्ही निवडून दिलेला आमदार मंत्री झाला असून कामगिरीनुसार माझे मंत्रिपद पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. आपली सुरुवातच दमदार झाली असल्याने २०२९ पर्यंत विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये असेल, असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला. येथील शिवाजी महाराज चौक येथे गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळ तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावतीने मंत्री नीतेश राणेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाचा केक कापल्यानंतर राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ. संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, वागदे सरपंच संदीप सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी संतोष उर्फ पप्पू पुजारे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, सुशील पारकर आदी उपस्थित होते. 

राणे म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त आज सिंधुदुर्गासह रत्नागिरी जिल्ह्यातही आगळेवेगळे वातावरणा अनुभवायला मिळाले. गेली दहा वर्षे तुम्ही सर्व सहकारी माझा वाढदिवस जोमाने, उत्साहाने साजरा करत आहात. पण, यावर्षीचा वाढदिवस थोडा वेगळा होता. कारण, जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू परत एकदा कणकवली झाली आहे. साहजिकच आज वाढदिनी वेगळे वातावरण पहायला मिळाले. नारायण राणे यांनी राजकारणाच्या पलिकडे नाती जोडलेली असून आम्ही त्यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. नारायण राणेंचा पुत्र म्हणून मी नेहमीच विचार करतो की माझ्या राजकीय, सामाजिक प्रवासामध्ये नविन नातेसंबंध निर्माण केले असतील नसतील, पण नारायण राणेंनी निर्माण केलेले नातेसंबंध टिकवण्याचे माझे परमकर्तव्य असून त्यानुसारच मी आतापर्यंत कार्यरत आहे.

राणे पुढे म्हणाले, आपले सरकार सत्तेत येऊन जवळपास १५० दिवस उलटले आहेत. तुम्ही निवडून दिलेला आमदार मंत्री झाला आहे. पहिल्या १०० दिवसांचा विचार केला तर माझे मंत्रिपद पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे. हे सगळे तुमच्या प्रेम, विश्वासामुळेच शक्य झाले आहे. माझा सिंधुदुर्ग जिल्हा, माझा मतदारसंघ मी तुमच्याच खांद्यावर सोपवून माझे मंत्रीपदाचे खाते सांभाळत आहे. तुम्हीही मला समर्थपणे साथ दिली आहे. ही तर सुरुवात आहे. फक्त काही ओव्हर्स झाल्या असून पूर्ण ५० षटके बाकी आहेत. सुरुवातच दमदार झाल्यामुळे २०२९ पर्यंत आपण काय वातावरण निर्माण करू, याचा अंदाज सर्वांनाच आला असेल. आपण सर्वजण नारायण राणेंचे छावे आहोत. आपण ज्या पदावर बसतो, ते पद गदागदा हलविण्याचे काम आतापर्यंत आपण सर्वजण करत आलो आहोत. नारायण राणे यांनी पालकमंत्री म्हणून जे काही कार्य केले, त्यांच्या मनात काही संकल्पना होत्या, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर आहे. २०२९ पर्यंत आपला सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या बाबातील राज्यातील पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणून दाखवेन, असेही राणे म्हणाले. 

येणारा काळ हा जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा आहे. साहजिकच पुढच्या वर्षी ह्याच छ. शिवाजी महाराज चौकात माझा वाढदिवस साजरा होत असेल तेव्हा लोकप्रतिनिधीचे पद असणारे असंख्य सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असतील, असा मला विश्वास आहे. सिंधुदुर्गातील जनतेने आतापर्यंत प्रेम, विश्वास दिला असून माझ्या खांद्यावर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी टाकली आहे, याबाबात जनतेचा आभारी असल्याचेही राणे म्हणाले. फोटो