कणकवली : कलमठ गावातील वीज वितरण कंपनीबाबतच्या विविध समस्यांबाबत यापुर्वी वारंवार लेखी निवेदन तसेच प्रत्यक्ष भेट देवुन चर्चा करून देखील त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ग्रामस्थांसह १ सप्टेंबर रोजी वीज वितरण विभागीय कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात मेस्त्री यांनी म्हटले आहे, कलमठ गाव अर्बलना जोडणे, सबस्टेशन ते कलमठ स्वतंत्र लाईन करणे, कलमठ बिडयेवाडी ट्रान्सफार्मर बसविणे, कलमठ स्वराज्य नगर व मनोरमा पार्क स्ट्रीट लाईट, कलमठ बाजारपेठ शाळा थ्री फेज लाईन, कलमठ दत्तनगर, कुंभारवाडी, टेंबवाडी, सिध्दार्थ कॉलनी, गुरववाडी मागणी असलेले विज खांब बसविणे या कामा बाबत वीज वितरण कार्यालयाशी वारंवार संपर्क करुन देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने स्थानिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधी म्हणुन आम्हाला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे या प्रश्नी उपोषणाचा इशारा मेस्त्री यांनी दिला आहे . सध्या कलमठ गावामध्ये गणेश मूर्ती शाळा असून, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याने या मूर्ती शाळांना देखील याचा फटका बसत आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील या वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास होत असल्याच त्यांनी म्हटलं आहे.