जिल्हाधिकारी कार्यालयातील 'पालकमंत्री कक्षा'चे उद्घाटन

'पालकमंत्री कक्षा' मुळे जनतेचे प्रश्न जलदगतीने सुटणार : पालकमंत्री नितेश राणे
Edited by:
Published on: March 08, 2025 17:03 PM
views 668  views

सिंधुदुर्गनगरी : सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी 'पालकमंत्री कक्षा'ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे अधिक गतीमान पध्दतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे.  हा कक्ष प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार असून या कक्षामुळे जनतेचे प्रश्न जलदगतीने सुटणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये 'पालकमंत्री कक्षा'ची स्थापना करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरातील कार्यालयांमध्ये सामान्य जनतेची अनेक कामे असतात. या कक्षाच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पालकमंत्री म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस या कक्षामध्ये उपलब्ध राहणार असून त्याबाबत जनतेला वेळोवेळी कळविण्यात येणार आहे. जेणेकरुन नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे  येतील आणि त्यांची प्रलंबित कामे मी पूर्ण करुन देईल. नागरिकांची अनेक कामे राज्य शासनाकडे देखील प्रलंबित असू शकतात त्या कामांचा पाठपुरावा देखील या कक्षाच्या माध्यमातून घेतला जाईल. जनतेची कामे अधिक गतीमान पध्दतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापनेमागचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले .