मालवणात ६७ शिक्षकांचा शिक्षक भारतीत प्रवेश

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 24, 2024 10:34 AM
views 203  views

मालवण : मालवण तालुक्यात नवनियुक्त ८५ कार्यरत शिक्षकांपैकी ६७ शिक्षकांनी शिक्षक भारती संघटना मालवण शाखेत जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान उर्वरीत शिक्षक लवकरच शिक्षक भारतीत प्रवेश करतील, असा विश्वास मालवण तालुका अध्यक्ष दिनकर शिरवलकर, सचिव कृष्णा कालकुंद्रीकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा मालवण यांच्या वतीने शिक्षक सन्मान व जाहिर प्रवेश मेळाव्याचे आयोजन मामा माडये हॉल, कट्टा येथे शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यावेळी शिक्षक भरती लढ्यातील अग्रणी राधिका जगदाळे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच भाग्यश्री भोसले, राजश्री बदरखे, सर्जेराव घुटे, अस्मा तांबोळी, श्याम ताठे यांनी भरतीचा इतिहास व प्रवास सांगितला. यावेळी राज्य संघटक किसन दुखडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्या नेहा गवाणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सातवसे , मंगेश बागवे शिक्षक नेते संतोष परब, संतोष कोचरेकर, धानजी चव्हाण, महिला आघाडी अध्यक्ष शितल परुळेकर, सचिव सेजल परब, उपाध्यक्षा स्मिता गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष विनेश जाधव, मालवण तालुक्यातील पदाधिकारी व शिक्षक भारती संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा कालकुंद्रीकर यांनी व सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले.

यावेळी नवनियुक्त शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेने शिक्षक भरती होण्यासाठी केलेले सहकार्य आणि सेवेत आल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवलेली कामकाजाची पद्धत याने प्रभावित झाल्याचे सांगत शिक्षक भारती संघटना हा विश्वसनीय पर्याय असल्याने शिक्षक भारती संघटनेत स्वेच्छेने सामील होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. काही कारणास्तव मेळाव्यास उपस्थित नसणाऱ्या नवनियुक्त शिक्षकांनी आपण शिक्षक भारती संघटनेमध्येच सभासद होत असल्याचे मालवण कार्यकारिणी सदस्य यांना संपर्क साधत कळविले आहे. जाहीर प्रवेश व कार्यकारिणी विस्तार देखिल यावेळी कऱण्यात आला.

कार्यक्रम दरम्यान किसन दुखंडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील १५ गरजू विद्यार्थ्यांना १५ हजार रु. चे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक भारती सभासद यशस्वी पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला.