
दोडामार्ग : गेल्या काही महिन्यापासून टस्कर व अन्य हत्ती चंदगड तालुक्यात स्थिरवल्याने शेतकरी थोडे निर्धास्त होते. मात्र शुक्रवारी टस्कर पुन्हा तिलारी खोऱ्यात परतल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. याउलट वनविभाग मात्र सुशेगात आहे. संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक वनपरिमंडळाना नियमित वनपाल नियुक्ती देत असताना सर्वात जास्त हत्ती व वन्यप्राणी उपद्रव असलेल्या कोनाळ वनपरिमंडळ कारभार वर्षभरापासून नियमित वनपालाविना हाकला जात आहे. चक्क दोडामार्ग मधीलच खडपडे वनपरिमंडळ यांच्या माथी हा कोनाळ चा अतिरिक्त कार्यभार मारून वनविभाग सुशेगात आहे. यामुळे वन्यप्राणी आणि हत्ती प्रतिबंध उपयोजना, नियोजन, शेतकरी यांचे नुकसानी वेळेत पंचनामे या साऱ्याचाच सपशेल बोजवारा उडाला आहे. प्रभारी वनपाल यांचीही या डबल कार्यभारामुळे कूचबना होत असून त्याचा परिणाम तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. जिल्ह्यात हत्ती प्रश्न सर्वात जटील असताना जिल्ह्यातील वनविभाग कोनाळ वनपरीमंडळ साठी नियमित वनपाल देत नसल्याने आच्छर्य व्यक्त होत असून शेतकऱ्यांत तीव्र संताप आहे. तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी यांचेही याकडे लक्ष नसल्याचे बोललं जातं आहे.