कणकवली : गेल्या अनेक वर्षापासून सरपंचांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मार्गी लावण्यात याव्यात,अशी मागणी भाजपा प्रणित सरपंच सघटनेची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. त्यात ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाईट बिले राज्य सरकारकडुन भरण्यात यावीत, घरबांधकाम परवानगीच्या जाचक अटी रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर अधिकार द्यावेत, या प्रमुख मागण्या केल्या आहेत. ना.चव्हाण यांनी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, दत्ता सामंत, माजी आ.अजित गोगटे, बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. तर भाजपा प्रणित सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष दादा साईल, उपाध्यक्ष विनोद राऊळ, आफ्रोजा नावलेकर, जिल्हा सरचिटणीस महेश मांजरेकर, गुरूप्रसाद (पंढरी) वायंगणकर, दाजी राणे, खजिनदार मंगेश तळगावकर, चिटणीस संजय शिरसाट, प्रमोद गावडे, उदय नारळीकर, मनोज उगवेकर, नागेश आईर, महेश शिरवलकर, नागेश परब, सुहास राणे, समीर गावडे, उदय धुरी, अंकुश कदम, सुरेश शेटवे, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या..
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरबांधकाम परवानगीच्या जाचक अट रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणे कलम५२ नुसार ग्रामपंचायतींना बांधकाम परवानग्या घेण्याचे अधिकार प्राप्त व्हावेत.
२. सरपंचांचा एक प्रतिनीधी जिल्हा नियोजन समितीवर स्विकृत सदस्य म्हणुन घेतला जावा.
३. ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाईट बिले हि राज्य सरकारकडुन जिल्हापरिषदे मार्फत भरली जातात परंतु गेले दोन वर्ष कालाधित हि बिले भरली नसल्यामुळे ग्रामपंचायातींना नाहक त्रास भोगावा लागत आहे. बिले लवकरात लवकर भरून मिळावीत. त्यासाठी योग्य ती तरतुद व्हावी.
४. आपले सेवा केंद्रातील अडचणी दुर होण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी यामधील सरपंचांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्च स्तरीय बैठक आयोजित करावी.