कणकवली : सध्या नवरात्रोत्सव अगदी आनंदात आणि जल्लोषात देशभर साजरा होत आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना, स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत शक्तीचा जागर करणे आणि स्त्रीशक्तीचा जागर करायचा म्हणजे स्त्रीचे मनोबल आत्मबल वाढवणे आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत राजवाडी उत्कर्ष मंडळ, नाटळ ( मुंबई ) संचलित माध्यमिक विद्यालय नाटळ परिवारातर्फे विद्या समिती अध्यक्षा सौ. उमा भालचंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून सरस्वती पुजनाचे औचित्य साधत, समाजातील प्राथमिक स्तरापासून काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी " नवदुर्गा - स्त्री शक्तीचा सन्मान " हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाटळ, दारिस्ते, दिगवळे या गावांमधील नवदुर्गांना हा सन्मान देण्यात आला.
मराठी परंपरेनुसार दहावीच्या विद्यार्थिनींनी सर्व सत्कारमूर्तींचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले याप्रसंगी या नवदुर्गांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हा सन्मान सौ. कविता सावंत, सौ. दिपाली नेवाळकर, श्रीम. अर्चना ताम्हाणेकर, सौ. शमिका सावंत, सौ.आर्या कांबळी , सौ.हर्षदा सावंत, सौ. वीणा राणे, सौ. गौरी मुरकर, श्रीम. प्रणिता बांबुळकर या नवदुर्गांना आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन हा सन्मान गावातील महिलांच्या हस्ते प्रदान करत एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सन्मान प्राप्त नवदुर्गांनी आपल्या मनोगतात माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेप्रती आभाराच्या भावना व्यक्त करत आदरपूर्वक सन्मानाचा स्वीकार केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था उपाध्यक्ष श्री. मोहन कदम, श्री. सुभाष सावंत, श्री. हेमंत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सी.टी तांबे यांनी प्रास्ताविकातून आपले मनोगत व्यक्त केले.
शालेय समिती चेअरमन श्री. नितीन सावंत, संस्था अध्यक्ष श्री. भालचंद्र सावंत, सेक्रेटरी श्री. निलेश सावंत तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक - शिक्षकेतर वृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नवदुर्गांचे अभिनंदन केले.