मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज ; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : इर्शाद शेख

सिंधुदुर्ग काँग्रेस तर्फे जाहीर निषेध
Edited by: दिपेश परब
Published on: September 03, 2023 15:51 PM
views 89  views

वेंगुर्ला :  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस जाहीर निषेध करीत आहे गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

       सत्ता आमच्याकडे द्या मी मराठा आरक्षण ताबडतोब देतो असे सांगणारे देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊन दिड वर्ष होत आले पण मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि त्वरित राजीनामा दिला पाहिजे.

     मराठा आरक्षण देण्याबाबत भाजप ने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे. मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत असे इर्शाद शेख यांनी सांगीतले.