म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची टीका
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 13, 2023 14:54 PM
views 211  views

कुडाळ :  कुडाळ ते  मुंबई जाणाऱ्या शयनयान एसटी बस सेवेची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी.त्याची जाहिरात व्हावी आणि हि सेवा निरंतर सुरु रहावी, एसटीचे उत्पन्न वाढावे.त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी आमदार या नात्याने वैभव नाईक यांनी शयनयान बस चालविली होती. त्या बसमध्ये प्रवासी बसलेच नव्हते. आणि त्यांनी हि एसटी बस कुडाळ डेपोच्या आवारातच आणि अगदी कमी वेगात चालविली होती. भाजप पदाधिकारी ज्याप्रमाणे टीका करत आहेत ते केवळ आमदार वैभव नाईक यांच्या द्वेषापोटी करत आहेत. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मध्ये होत असलेली विकास कामे आणि जनतेचा त्यांना मिळणारा  पाठींबा याचा पोटशूळ  भाजप पदाधिकाऱ्यांना असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची गेले चार दिवस दडपशाही सुरु आहे. अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे. 

ते पुढे म्हणाले, आ. वैभव नाईक हे ५० खोक्यांसाठी  भाजप आणि शिंदे गटात गेले नाहीत.ईडी सीबीआय, एसीबी कारवाईला ते घाबरले नाहीत. म्हणून आता त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सूरु आहे. मात्र वैभव नाईक हे बाळासाहेब ठाकरे , उद्धवजी ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत. एसटी चालविली म्हणून एखादा  गुन्हा दाखल झाला तरी त्यांना त्याची कोणतीही फिकीर नाही. ते चौकशीला घाबरणारे नाहीत आणि चौकशी लागली तर आम्ही सर्व कार्यकर्तेही आ. वैभव नाईक यांच्यासोबत चौकशीला सामोरे जाऊ.त्याचबरोबर एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी भाजप पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील एकमेव  कुडाळ तालुक्यातील कुडाळ आणि ओरोस या बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले. मालवण येथील बसस्थानकाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात इतर कुठेही बसस्थानकांचे काम झाले नाही हि वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ डेपोसाठी नुकत्याच नवीन  ९ एसटी बस दाखल झाल्या आहेत. आता कुडाळ ते मुंबई हि शयनयान (स्लीपर) बस सेवा सुरु झाली आहे. याचेही श्रेय आ. वैभव नाईक यांचेच आहे. प्रत्येक विभागाचा निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात आणला आहे. याचीच धास्ती भाजपने घेतली असून भाजप पदाधिकाऱ्यांना जळी -स्थळी-काष्टी वैभव नाईकच दिसत आहेत असा घणाघात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केला आहे.