
दोडामार्ग : वन्य हत्ती उपद्रव रोखण्यासाठी हत्ती पकड मोहीम राबवा अशी मागणी शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे वन्य हत्ती कळपाकडून मोठ्या प्रमाणात नारळ, सुपारी, केळी, बांबू, शेती, याचे नुकसान केले जात आहे. हत्ती पकड मोहीम बाबत सरकार, वन विभाग वेळ काढत आहे. तोपर्यंत नुकसान रोखण्यासाठी वन विभागाने हत्ती वावर असलेल्या गावात हाकारी गटाची नेमणूक करून हत्ती रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या हाकारी सोबत काही वन कर्मचारी वनरक्षक देखील दिले आहेत. या हाकारी गटाचे काम कौतुकास्पद असून त्यांच्या निरीक्षण मुळे वन्य हत्तीच्या वास्तव्य व ठेवठीकांबाबत शेतकऱ्यांना वेळीच माहिती मिळत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिलीय.
तळकट, कोलझर, झोळंबे गावात नुकसान होऊ नये यासाठी हाकारी प्रयत्न करत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील वन्य हत्ती उपद्रवमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. जंगली हत्ती कळप कधी मोर्ले केर भागात तर लगेच शिरवल, तळकट, कोलझर, झोळंबे गावात असा प्रवास सुरू आहे. हा कळप घाटमाथ्यावर जाणार असा अंदाज होता. पण अद्याप हा कळप दोडामार्ग तालुक्यात आहे. वन अधिकारी यांनी नुकसान टाळण्यासाठी आता त्या त्या गावातील स्थानिक तरुणांना हाकारी म्हणून राञी व दिवसा नेमणूक केली आहे. मोठी हाकारी टीम तयार केली आहे. सोबत वन कर्मचारी तसेच आवश्यक साधनसामग्री दिली आहे. हाकारी यांच्या नेमणूकमुळे नुकसान होणे काही प्रमाणात कमी झाले आहे. तर हत्तीचा ठाव ठिकाणा सुद्धा सोशल मीडिया ग्रुपवर शेतकरी व ग्रामस्थांना मिळत असल्याने त्याचा फायदा होतं आहे. मात्र हत्ती पकड मोहीम झाली पाहिजे यावर शेतकरी ठाम आहेत.