दोडामार्गच्या वीजप्रश्नाबाबत घारेंनी घेतली जयंत पाटील यांची भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2024 10:40 AM
views 164  views

सावंतवाडी : महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग तालुका व शहराला देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी निवेदन दिले होते. यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांचे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे. घारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती त्यांनी केली आहे. 

दोडामार्ग शहर आणि तालुका परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने तालुक्यातील नागरीक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील कोनाळकट्टा येथे महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. ही खाजगी कंपनी व राज्य शासनाचे महावितरण विभाग यांच्यात जो करार झाला होता तो संपुष्ठात आल्याने त्याचा विपरीत परिणाम वीज वितरणावर होत आहे. सासोली व कोनाळकट्टा या दोन्ही उपकेंद्राचे अंतर 55 ते 60 कि. मी. असल्याने विद्युत पुरवठा कमी दाबाचा होत आहे.

तसेच बरीचशी विद्युत लाईन ही जंगल भागातून येत असल्याने अनेकदा काही कारणाने बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करता येत नाही. वाढती लोकसंख्या व मागणी लक्षात घेऊन महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग तालुका व शहराला देण्याबाबत अर्चना घारेंनी माजी मंत्री आम.जयंत पाटील यांचे लक्ष वेधले होते. यानंतर सौ. घारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपले स्तरावरुन संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आम. जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी असे पत्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कोकण विभाग अधीक्षक अभियंता यांनाही आ. जयंत पाटील यांनी दिले आहे.