आंबोली - बेळगाव रस्त्याचं काम 'त्या' ठेकेदाराकडून पुन्हा करून घ्या

परशुराम उपरकरांनी वेधलं कार्यकारी अभियंत्यांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: August 29, 2023 15:17 PM
views 138  views

सावंतवाडी : आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता रस्त्यावरील पडलेले खड्डे तात्काळ पावसाळी डांबराने बुजवून घ्या अशी मागणी माजी आमदार मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याजवळ केली. तर आंबोली बेळगाव रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता संबधित ठेकेदाराकडून ते काम पुनश्च करुन घ्या अशी मागणीही श्री उपरकर यांनी केली.


येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी श्री केणी यांनी नुकताच पदभार स्विकारला. याच पाश्र्वभूमीवर श्री उपरकर यांनी त्यांची भेट घेत काही गोष्टीकडे लक्ष वेधले. दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीस धोका निर्माण झालेला आहे काही नव्याने केलेल्या रस्त्याचे डांबरही उखडून गेल्याने बऱ्याच ठिकाणी बांधकामच्या कारभाराबाबत नाराजी आहे. आगामी गणेश चतुर्थी सणही तोंडावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाकरमाने दाखल होणार आहेत रस्त्यावरील वाहतुकीची रहदारी वाढणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे चतुर्थीपूर्वी बुजून घ्या हे खड्डे बुजवताना त्यामध्ये चिऱ्यांची माती न टाकता पावसाळी डांबराने ते बुजवा जेणेकरून ते पुन्हा उखडणार नाहीत. याशिवाय सावंतवाडी आंबोली बेळगाव रस्ता व बांधाजोडामार रस्ता अशा महत्त्वाच्या रस्त्यावरीलही खड्डे तात्काळ बुजून घ्या अशी मागणी केली तर सावंतवाडी बेळगाव रस्त्याचे झालेले निकृष्ट काम व वाहून गेलेला रस्ता पाहता संबंधित ठेकेदाराकडून हे काम पुनश्च करून घ्या अशी मागणी ही त्यांनी केली.

यावेळी आंबोली बेळगाव त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून हाती घेण्यात आले आहे झालेल्या निकृष्ट कामाबाबत त्यांना नोटीसही बजावण्यात आलेली आहे. शिवाय पावसाळ्यानंतर हे काम नव्याने करून घेण्यात येणार आहे. त्याशिवाय संबंधिताला या कामाचे बिल अदा केले जाणार नाही. दुसरीकडे पावसाळ्यात रस्त्यावरील पडलेले खड्डे पाहता गणेश चतुर्थी पूर्वीच हे खड्डे पावसाळी डांबराने भरले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक डांबराची मागणी करण्यात आली आहे आपण स्वतः काही रस्त्यांची पाहणी केली आहे त्यादृष्टीने संबंधितांना सूचनाही केले आहेत. या ठिकाणी लोकप्रतिनिधी तसेच पुढारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे निश्चितच भविष्यात ही मुख्य रस्त्याबाबत आपण जातींची लक्ष देणार आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी बदल दिसून येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक, निलेश देसाई, नंदू परब, विजय जांभळे, अभि पेंडणेकर, सागर येडगे, रमेश शेळके, प्रमोद गावडे, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.