सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करून निवृत्त झालेले कसाल गावचे सुपुत्र तसेच ग्रामपंचायत सदस्य गणपत भगवान कसालकर ६४ यांचे गुरुवारी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
असाल बालवाडी येथे राहणारे गणपत कसालकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शेजवली प्राथमिक शाळेत केंद्र मुख्याध्यापक म्हणून तसेच संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कन्या शाळेत आपली शिक्षकी सेवा दिली होती. या कन्या शाळेतूनच ते सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर कसाल या आपल्या मूळ गावी येऊन ते विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते. कसाल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य म्हणून ते कार्यरत होते. तर अलीकडेच निर्माण झालेल्या कसाल रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे ते खजिनदार म्हणून काम करत होते. कसाल गावातील सर्व सामाजिक तसेच सार्वजनिक कामांमध्ये आपला पूर्ण सहभाग देणारे गणपत कसालकर यांचा 25 जानेवारी रोजी अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातून ते पूर्ण बरे होतील असा विश्वास वाटत असतानाच गुरुवारी त्यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले. या निधनाची बातमी कसाल परिसरात समजतात कसाल परिसर अक्षरश: दुःखाच्या छायेत कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक डॉक्टर आणि एक इंजिनियर मुलगा, सूना, नातवंडे, भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे.