
सावंतवाडी : तालुक्यातील अकरा दिवसांच्या गणरायाला अनंत चतुर्दशीला पुढच्या वर्षी लवकर या....! अशी साद घालत मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाला देखील भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
गेले अकरा दिवस आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या. मंगळवारी सायंकाळपासून अठरा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चितारआळी, व सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वजनिक गणरायाना देखील मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणूका खास आकर्षण ठरल्या. ढोल-ताशा, डिजे, महिलांच्या फुगड्या, आकर्षक चित्ररथ खास आकर्षण ठरले. रात्री उशिरा सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आला.
गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था त्यांनी केली. लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जनस्थळी मंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. पुष्पवृष्टी नंतर लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला. ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अकरा दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या.तर भातशेतीतून डोक्यावरून गणपती विसर्जनस्थळी घेऊन जातानाचा क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला. नदी, तलाव, पाणवठे आदी ठिकाणी लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या...! असं वचन घेत निरोप देण्यात आला.