पाच दिवसांच्या गणरायाला भक्तीभावानं निरोप

Edited by: विनायक गांवस
Published on: September 12, 2024 11:32 AM
views 135  views

सावंतवाडी : पाच दिवसांच्या गणरायाला बुधवारी रात्री उशिरापर्यंत मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या विसर्जन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती.

गेले पाच दिवस आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या. बुधवारी सायंकाळपासून पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. पाच दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील विसर्जन स्थळी उपस्थितीती दर्शविली होती. तसेच गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था त्यांनी केली. लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जनस्थळी मंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली. यामुळे तलावाच्या विसर्जन स्थळांना वेगळा लूक आला होता. पुष्पवृष्टी नंतर लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला.