सिंधुदुर्ग : उद्या दिनांक 27 जुलैला देशात किसान समृद्धीचा एक नवा अध्याय रचला जात आहे. सुमारे 1.25 लाखाहून अधिक “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र” उद्यापासून कार्यान्वित होत आहेत. त्यातील 14429 केंद्रे महाराष्ट्र राज्यात तर 156 केंद्रे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहेत.156 केंद्रांपैकी 16 केंद्रे ही ब्लॉक लेव्हल तर 140 केंद्रे ही ग्राम पातळीवरची आहेत. सद्यस्थितीत शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी तसेच मातीपरीक्षण, संशोधन आणि मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या दुकानात किंवा संस्थांमध्ये जावे लागते. 'पंतप्रधान किसान सुविधा केंद्र' ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे.एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे व खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे.
किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत, खत आणि औषधांसाठी देण्यात आलेले अभूतपूर्व अनुदान, पंतप्रधान प्रणाम योजनेतून शेती आणि माती रक्षणासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय यानंतर "पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रां"चा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणत आहेत. पीएम किसान समृद्धी केंद्रातून एकाच छताखाली अनेक सुविधा उपलब्ध होतील. शेती म्हटली म्हणजे खते, माती, बियाणे, औषधे आलीच. अनेकदा ती महागड्या किमतीत उपलब्ध होतात. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळत नाही. त्यात शेतकऱ्यांची अनेकवेळा फसवणूक होते. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांच्या या समस्या विचारात घेऊन त्यांची स्थिती सुधारावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पीएम किसान समृद्धी केंद्राची भेट दिली आहे.
वन नेशन वन फर्टिलायझर योजनेंतर्गत खते, बियाणे व कीटकनाशकांसह अनेक प्रकारची शेती उपकरणे यंत्रसामग्रीही या केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनाही यंत्रसामग्री भाड्याने घेता येणार आहे. येथून शेतकरी भारत ब्रँडचे खत (वन नेशन वन खत योजना) सहज खरेदी करू शकतील. शेतकरी माती परीक्षण करून घेऊ शकतात. याशिवाय १५ दिवसांत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी मोहीमही राबविण्यात येणार आहे. मंडईभोवती केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या केंद्रांवर शेतकऱ्यांचा प्रवेश अधिक सुलभ होणार आहे. ही केंद्रे सुरू करण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीबाबत जागरुक करून शेतीसाठी लागणारी यंत्रे, बियाणे इत्यादी चांगल्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे. या केंद्रांच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न एकाच छताखाली सोडवले जातील. देशातील खतांच्या दुकानांवर उत्पादक कंपन्यांकडून डीलरमार्फत खत उपलब्ध करून दिले जाते. यात अनेकदा वेळ जातो. परंतु येथे उत्पादक कंपनी थेट समृद्धी केंद्रांशी जोडली जाईल आणि स्वस्त दरात कृषिसेवा प्रदान करण्यास सक्षम असेल. केंद्र सरकार नव्या किसान समृद्धी केंद्रात सुविधांची व्याप्ती वाढवणार आहे. या केंद्रांना भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना खतांच्या अपघात विम्याचाही लाभ मिळणार आहे. इफकोकडून खतांच्या गोणीवर ४००० रुपयांचा अपघाती विमा दिला जातो. त्यासाठी खत खरेदी केल्यानंतर ग्राहकाला पॉक्स मशिनचे पक्के बिल घ्यावे लागते. याशिवाय शेतीशी संबंधित घटनांसाठी अपघात विम्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.
२२ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून "पी.एम. किसान योजनेंतर्गत" ६०० किसान समृद्धी केंद्रे सुरू करण्यात आली होती. खते, औषधे, बि- बियाणी, आधुनिक परिक्षण उपकरणे व अन्य माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी विनाकष्ट उपलब्ध व्हावी यादृष्टीने करण्यात आलेला तो प्रयोग होता. यातून अतिशय सकारात्मक परिणाम हाती आल्यानंतर पंतप्रधानांनी त्यावेळी घोषणा केली होती की लवकरच अशी किमान एक लाख केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेसाठी देण्यात येतील. ती घोषणा अवघ्या काही महिन्यातच वास्तवात उतरत येत्या २७ जुलैला देशभरात एक लाख पंचवीस हजार किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या शुभहस्ते होत आहे
या केंद्रावर शेतकऱ्यांना फक्त खते व औषधेच मिळतील असे नाही, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या पिकावर आलेल्या कोणत्याही आजारावर मार्गदर्शन मिळेल, आधुनिक लिफ-लॅब द्वारे पिकाचे परीक्षण करून घेण्याची सोय असेल, लॅबोरेटरीत त्याच्या कृषी उत्पादनाचे परीक्षण आणि कोणती रोगप्रतिकारक औषधे वापरली पाहिजेत याचे नेमकेपणाने मार्गदर्शन तिथे होईल. माती परीक्षण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी त्याची मशिनरी याठिकाणी असणार आहे. एवढेच नव्हे, तर सीएससी सेंटरची सुविधा इथे असेल, ज्यात कृषीविषयक सरकारी योजनेची माहिती देत लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन ते योजनेचा फॉर्म भरण्यापर्यंतची सर्व मदत केली जाईल. साहजिकच, शेतकरी हा सरकारी योजनांचा लाभही घेऊ शकतो आणि सध्या घेत असलेल्या पिकांमध्ये सुधारणाही करून आर्थिक उन्नती साधू शकतो.
भविष्यात किसान समृद्धी केंद्र हे एक असे व्यासपीठ बनेल, जिथे आपण कृषी विषयक कोणताही कार्यक्रम घेऊ शकतो. ज्याठिकाणी बसून कोणताही शेतकरी कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवू शकतो. एवढेच नव्हे तर कृषिमंत्र्यांना किंवा फर्टीलायझर मंत्रालयाला शेतकरी ज्या काही सूचना करू इच्छित असेल त्या थेट या केंद्राद्वारे करण्याची सुविधा देण्यात येईल. अगदी पंतप्रधानांनाही संपर्क करण्याची व्यवस्थाही असेल. देशाच्या पंतप्रधानांना थेट शेतकऱ्यांशी जोडण्यासाठीचा हा देशातील अभिनव प्रयोग म्हणता येईल. म्हणूनच आपल्या सहभागातून जवळच्या किसान समृद्धी केंद्राला सक्षम बनवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.
सध्या जिल्हा,ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे.या केंद्रांची देशातील संख्या 2 कोटी 80 लाख इतकी आहे,पैकी 1 लाख केंद्र “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र” म्हणून रूपांतरित करण्यात येत आहेत,येत्या वर्षा अखेरीस उर्वरित 1.80 कोटी शॉपचे रूपांतर PMKSK मध्ये होणार आहे. या योजनेचे उदघाटन २७ जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राजस्थान येथून होणार असून या प्रसंगी 8.50 कोटी पीएम किसान लाभार्थी यांना 14 व्या हप्त्याचे हस्तांतरण होणार आहे. यावेळी ते शेतकऱ्यांशी सुसंवाद साधणार आहेत.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://pmevents.ncog.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे किंवा https://pmindiawebcast.nic.in या लिंक वर जावून ऑनलाईन कार्यक्रम सुध्दा बघू शकतील. तसेच सदरील कार्यक्रम जवळील कृषी केंद्रावर लावलेल्या टीव्हीवर सुद्धा शेतकरी बघू शकणार आहे. जिल्ह्यातील 17 प्रमुख केंद्रांवर तसेच 140 ग्रामीण पातळीवरील केंद्रांवर हा कार्यक्रम प्रक्षेपित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन सरकारी यंत्रणेसोबत जिल्हा भाजपाने केलेले आहे. जेणेकरून या संबंधीची माहिती लोकांपर्यंत पोचून त्यांना या केंद्रांचा लाभ घेता येईल.
संबंधित कार्यक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी भाजपा मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांच्याशी शेतकरी संपर्क साधू शकतात. सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शेतकऱ्यांना केले आहे.