
वेंगुर्ले : तालुक्यातील वरचेमाड ते मोचेमाड येथील तिलारी पाण्याच्या पाईप लाईनचा पॉवर पंप शुद्धीकरण करणारे पंप हाऊस बांधण्यात आले आहे. त्यासाठी ११ केव्ही वीजपुरवठा लागणार आहे. यामुळे वरचेमाड ते मोचेमाड अशी भूमिगत विद्युत वहिनी टाकण्यासाठी मे अखेरीस ते जून १० तारीख पर्यंत काम चालू होते. या लाईन टाकण्याची खोदाई झाल्यानंतर रस्त्यालगतचा चर व्यवस्थित बुजवण्यात आला नाही. तसेच रस्त्यालगत असणारे गटार गटार बुजून टाकण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात गटारातील भले मोठे दगड माती रस्त्यावर आली.
दरम्यान हा वळणाचा भाग असल्याने उतार व चढावावरून येणाऱ्या वाहनाना याचा अंदाज नसल्याने या दगडांवर दुचाकींचे टायर स्लिप होऊन सकाळी ३ दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. तसेच गाड्यांचेही नुकसान झाले. या घटनांबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गावडे यांनी सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱ्यांना ही माती व दगड हटवण्या बाबत कल्पना दिली होती.
दरम्यान या रस्त्यावरून शुक्रवारी दुपारी परबवाडा येथील रक्तदाते नाना राऊळ रक्तदान करण्यासाठी गोवा येथे जात असताना दैव बलवत्तर म्ह्णून बचावले. रात्री १० वाजता वेंगुर्ला न्हैचीआड येथे पप्पू मोंतेरो हे त्याठिकाणी अपघातग्रस्त झाले. त्यांनी याबाबत संजय गावडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी गावडे यांनी आपत्कालीन जिल्हाधिकारी कक्षाला फोन करून कल्पना दिल्यानंतर तात्काळ वेंगुर्ले आपत्कालीन कक्षातून माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम मार्फत आपली टीम पाठवून रस्ता मोकळा करण्यात आला.
या वीज लाईन चे काम सुरू असताना त्या ठेकेदारास आपण हे सर्व घडणार आहे त्यामुळे लगेचच गटार मोकळे करून रस्त्यावरील माती बाजूला करण्याची समज दिली होती. मात्र त्यावेळी ठेकेदाराने दुर्लक्षित केले. याबाबत ज्या ज्या यंत्रणा याला जबाबदार होत्या त्यांनी याची गांभीर्यता वेळीच लक्ष घालून हे दगड माती बाजूला करून गटार मोकळे केले असते तर अपघात ग्रस्त झाले त्याचं हे नुकसान झालं नसते. परंतु सरकारी यंत्रणा याबाबत गंभीर दिसून येत नाही. लोकांचे प्राण घेऊनच हे सरकार विकासाच्या नावाखाली जनतेस वेठीस धरत असून या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली पाहिजे का तोडफोड केली पाहिजे? असा सवाल यावेळी संजय गावडे यांनी व्यक्त केला आहे.