कुडाळ : गेल्या १० वर्षाच्या कालावधीत विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात कार्य केले असुन आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खा. राऊत यांचाच विजय होणार असुन युवासेनेच्या माध्यमातून खा. राऊत यांच्या विजयासाठी विभागवार निर्धार मेळावे घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी दिली.
कुडाळ येथे युवासेना पदाधिकार्यांची मंदार शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकी नंतर मंदार शिरसाट यांनी पत्रकार घेतली. यावेळी युवासेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, युवासेना दोडामार्ग तालुकाप्रमुख मदन राणे, युवासेना उपतालुका प्रमुख सागर भोगटे, स्वप्नील शिंदे, विनय गावडे, युवासेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर, शहर समन्वयक अमित राणे, रोहित सावंत, मुकेश पालव, गुरु गडेकर, संदेश सावंत, प्रथमेश सावंत, विनय पालकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिरसाट यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुका लवकरच होणार आहेत, आमच्या पक्षाकडुन विद्यमान खा. राऊत यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. खा. राऊत यांचा विजय निश्चित आहे. युवासेनेच्या माध्यमातून आम्ही आतापासुनच प्रचार सुरू केला आहे. गेल्या 10 वर्षात खा. राऊत यांनी केलेल्या विकास कामांचे पत्रक काढले असुन ते जनते पर्यंत पोहचविणार आहोत. तसेच विभागवार निर्धार मेळावे घेणार आहोत.
युवासेनेच्या माध्यमातून पदवीधर मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात जास्तीत जास्त विक्रमी पदवीधर नोंदणी केली असुन, खा. राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना खा. राऊत यांच्या विजयासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेणार असल्याचे सांगितले.
राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठी भरती होणार आहे. मात्र परिक्षा केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही, या विरोधात योगेश धुरी यांनी आवाज उठविला आहे, आता याच पार्श्वभूमीवर केवळ तलाठीच नव्हे तर आगामी होणार्या सर्व सरकारी नोकरी भरतीची परिक्षा केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली पाहीजेत या करीता युवासेना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ही शिरसाट यांनी दिला.
दि. ४ जानेवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येत असुन यावेळी युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.