
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग शहरात भुमिगत वीज वाहिन्याद्वारे वीजपुरवठा करण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे फार गरजेचे आहे. त्यादृष्टीने महावितरण विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. दोडामार्ग तालुका हा जिल्ह्यातील सर्वात जास्त दुर्गम भागाने व्यापलेला असा तालुका आहे. कसई-दोडामार्ग शहर हे तालुका ठिकाण असून त्याठिकाणी सर्व शासकीय कार्यालये, बँका व तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्थांना व्यापार किंवा शासकीय कामासाठी या शहरामध्ये यावे लागते.
सद्यस्थितीत असलेल्या वीज समस्येमुळे लोकांचा वेळ, पैसा वाया जातो. त्याचबरोबर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा प्रकारे तालुक्यातील ग्रामस्थांसहित शहरातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यापुर्वी इन्सुली, सासोली, दोडामार्ग अशा भुमिगत वीज वाहिन्याद्वारे संपुर्ण तालुक्यात वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली होती. शहरातही भुमिगत वीज वाहिन्याद्वारे वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच महालक्ष्मी सबस्टेशनमधून झरेबांबर ते अशी नवीन विद्युत वाहिनी टाकून दोडामार्ग शहरासाठी वीजपुरवठा करण्यात यावा व आडाळी एमआयडीसी येथे होत असलेल्या सबस्टेशनमधून सासोली सबस्टेशनपर्यंत नवीन फिडरव्दारे वीजपुरवठा करण्यात यावा अशा विविध मागण्या नगरसेवक संतोष नानचे यांनी निवेदनाद्वारे महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर, नगरसेवक चंदन गावकर, कुंब्रल सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले भाजपा पदाधिकारी रमेश दळवी वगैरे उपस्थित होते.