
दोडामार्ग : आंबडगाव येथील खालची वाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पावसाळा सूरु झाला तरी पूर्ण नाही झाले. पर्यायी काढलेला रस्ताच रविवारी वाहून गेल्याने येथील महिला आक्रमक झाल्या होत्या. यावेळी उपस्थित दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाणही आक्रमक झाले. पुलाचे काम नझाल्यास ठेकेदाराची तक्रार पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबडगाव खालची वाडी व देऊळ वाडी या वाड्यांना जोडणाऱ्या पुलाच्या कामाला आॅगस्ट महिन्यात वर्क ऑर्डर मिळाली होती. मात्र, ठेकेदाराच्या मनमानी कारभामुळे भरपावसात या पुलाचे काम रखडून पडले आहे. ठेकेदाराने या दोन वाड्यातील लोकांना पर्यायी रस्ता काढला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे हा पर्यायी रस्ताच वाहून गेल्याची धक्कादायक घटना काल रविवारी घडली.
हा पर्यायी रस्ताच वाहून गेल्याने नागरिकांचे हाल झाले. कामाला जाणारे, शाळेत जाणारी मुले आज गावातच अडकून पडली. ही घटना नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना समजली लागलीच नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबडगाव गाठले. यावेळी चेतन चव्हाण यांनी बांधकामचे उपकार्यकारी अभियंता घंटे यांना घटना स्थळी आणले व त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी भाजप शहराध्यक्ष राजेश फुलारी, रंगनाथ गवस, विकी कवठणकर आदी उपस्थित होते.
खालची वाडी इथं मराठी शाळा आहे. आणि नदीच्या पलीकडे म्हणजेच देऊळवाडी आहे. दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे या नदीच्या बाजूने ये जा करण्यासाठी काढलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने देऊळवाडी येथील शाळेतील मुले आज शाळेच्या पहिल्याच दिवशी नदी पलीकडे अडकून पडली. रस्त्यावर पाणी असल्याने त्यांना आज शाळेत जाता आले नाही. सर्वत्र जिल्हा भर शाळेचा पहिला दिवस ढोल ताषांच्या गजरात साजरा केला जात होता. मात्र, आंबडगावात शाळेत जाण्यासाठीच्या पुलावर मुलांच्या पालकांचे भांडण पहावयास मिळाले.