LIVE UPDATES

हत्ती पकड मोहीम 'जैसे थे' | आदेश झाला अंमलबजावणी कधी..?

प्रवीण गवस आक्रमक
Edited by: लवू परब
Published on: June 02, 2025 19:48 PM
views 157  views

दोडामार्ग : हत्ती पकड मोहिमेच्या आदेशाला आज दोन महिने उलटले तरी देखील वनवीभागाकडून कोणतीच पावले उचली जात नसल्याने सरपंच सेवा संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष प्रवीण गवस यांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयात ठिय्या मांडला. जोपर्यंत हत्ती पकड मोहिमेबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नसल्याची भूमिका गवस यांनी घेतली.

गेले कित्तेक महिने वन्य हत्ती तिलारी खोऱ्यात आपला धुडगूस घालत आहेत. मोर्ले येथे एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी देखील गेला. याला सर्वस्वी वनविभागच जबाबदार असा आरोप प्रवीण गवस यांनी केलाय. त्या शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी 'त्या' ओंकार नामक हत्तीला पकडण्याचा आदेश दिला. ३० जूनपर्यंत 'त्या' हत्तीला पकडून दुसऱ्या जागेत नेण्यासंदर्भात लेखी पत्र दिलेल्याला आज दोन महिने झाले. मात्र. कोणाचेही सोयर सुतक नसलेल्या वनविभागाने कोणतीच पावले उचलेली नाहीत अशी खंत गवस यांनी व्यक्त केली.

खर तर हत्तीमुळे एक बळी गेल्यानंतर वनविभागाने जातीनिशी लक्ष घालून हत्ती पकड मोहीम एवढ्यात राबविली पाहिजे होती. मात्र, वनविभागाकडून कोणतीही ॲक्शन  घेतलेली नसल्याचे प्रवीण गवस यांनी सांगितले. सहाय्य्क वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्याशी बोलताना गवस म्हणाले की, तुम्हाला हत्ती पकड मोहिमेसंदर्भात काय माहीत नसेल आणि काय सांगत येत नसेल तर तुम्ही वरिष्ठांना बोलवा. जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हालणार नसल्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. यावेळी दत्ताराम देसाई, पंकज गवस आदी उपस्थित होते.

अजून कर्नाटक सरकारचा होकार  नाही

तिलारी खोऱ्यातील 'त्या' ओंकार हत्तीला ३० जून पर्यंत पकडण्याचा आदेश झाल्यानंतर वनविभागाने तात्काळ हालचाली करून हत्तीपकड मोहिमेसाठी कर्नाटक सरकारशी चर्चा करून तात्काळ  मोहीम राबविली पाहिजे होती. मात्र, अद्याप पर्यंत कर्नाटक सरकारची चर्चाच सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आठवड्याभरात कर्नाटक सरकारकडून होकार येणार असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे म्हणाले.

कार्यालयाचं तोंड बघणार 

दरम्यान, दोडामार्ग वनविभाग कार्यालय येथे ठिय्या मांडून बसलेले प्रवीण गवस व शेतकरी म्हणाले की हत्तीपकड आदेशाला आज दोन महिने झाले. वनविभागाकडून कोणतीच पावले उचलेली नाहीत. हत्तीपकड मोहीम होणार की नाही याच उत्तर आज आम्हाला वनविभाग किंवा इथल्या पालकमंत्र्यांनी द्यावे. उत्तर नसेल तर मी चुकून सुद्धा हत्तीपकड मोहिमेसंदर्भात एकालाही काहीच विचारणार नाही, वनविभाग कार्यालयाचं तर तोंड ही बघणार नाही असा आक्रमक पवित्रा  प्रवीण गवस यांनी घेतला.