पाणी देण्याचे आश्वासन

शेतकऱ्यांचं उपोषण मागे
Edited by:
Published on: May 02, 2025 17:55 PM
views 81  views

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी कसई - दोडामार्ग येथील कालव्याच्या डाव्या व उजव्या बाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळावे या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय दोडामार्ग येथे शुक्रवारी उपोषण छेडले होते. दरम्यान, उपसासिंचनाला आपण परवांगी देतो, शेतकऱ्यांनी स्वतःचे पाणी पंप बसवून शेतात घेऊ शकतात असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

कसई - दोडामार्ग येथील कालव्याच्या डाव्या व उजव्या बाजूच्या शेतकऱ्यांना तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी शेतीसाठी मिळत नाही. त्यामूळे या पाण्यापासून येथील शेतकरी वर्ग वंचीत राहीला आहे. कसई-दोडामार्ग तिलारी धरणाच्या लाभक्षेत्राखाली येत असून कालव्याकरीता शासनाने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या आहेत. येथील शेतकऱ्यांना शेती व बागायतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत नाही. मुबलक पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी ओस पडलेल्या आहेत. तिलारीचा डावा कालवा कसई-दोडमार्ग मधूनच जातो. त्यामुळे आतापर्यंत आपल्या विभागाकडे कालव्यातील पाण्याकरीता अनेकवेळा शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. परंतू आश्वासने देण्याव्यतिरिक्त आपल्या कार्यालयाकडून ठोस व आश्वासक असे काहीच घडले नाही असा आरोप देखील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यावेळी केला. 

आपल्याकडे प्रस्ताव आल्यानंतर माझ्या स्तरावरून व माझ्या अधिकारात जे करता येईल ते मी करून तुमची समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार आहे. प्रकल्पात तसे पाणी देण्याची तरतूत नाही आहे. तरी मी माझ्या स्थरावर पाणी उपसासिंचनाला परवांगी येऊ शकतो. मात्र पंप तुम्ही तुमच्या खर्चात घेऊन पाणी शेतीसाठी वापरून शकतात. त्यासाठी माजी काहीही हरकत नाही अस कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

यावेळी उपस्थित असलेले भाजपचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व स्थानिक आमदार व रत्नसिंधु योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्यामार्फत रत्नसिंधु योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्राप्रमाणे पंप व त्यासाठी आवश्यक असणारी पाईप लाइन मिळण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट केले. या दोहोंच्या आश्वासनानंतर कसई – दोडामार्ग मधील शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी उपोषणकर्ते संदीप गवस, चंद्रकांत मळीक, श्रीपाद गवस, गोविंद गवस, हनुमंत गवस, नारायण गवस, रवींद्र फाटक, महादेव गवस, राजाराम गवस, कृष्णा गवस, अनिल पालकर, नितीन पालकर आदी अनेकजण उपोषणात सहभागी झाले होते.