सुखाने तरी मरू द्या !

Edited by: लवू परब
Published on: July 06, 2024 12:40 PM
views 311  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील तेरवण गावातील गावठणवाडीतील स्मशानभूमीची अवस्था फार बिकट झाली असून ती शेवटच्या घटका मोजून कधी जमीन दोस्त होईल सांगतात येत नाही. मात्र या स्मशान शेडचे सरपंच यांना कोणतेच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे. तात्काळ या स्मशान भूमिचे काम केले नाही तर मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात समोर ठेऊ असे ग्रामस्थ सुभाष लक्ष्मण गवस यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की चार वर्ष झाली स्मशानभूमीवरील पत्रे वाऱ्याने उडालेले आहेत. दीड वर्षांपूर्वी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी गावात येऊन आम्हा ग्रामस्थाबरोबर बैठक घेतली  स्मशानभूमी दुरुस्त करू व लागलीच  तेथील एका फॅब्रिकेटर्स चे काम करणाऱ्यास स्मशानभूमीच्या डागबुजीसाठीचे अंदाजे खर्चाचे कोटेशन विचारून घेतले, त्यांनी खर्चही सांगितला. पण त्यानंतर अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जिल्हा परिषद सा.बा. खात्याकडे चौकशी केल्यावर  स्मशानभूमी बांधकामाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. याबाबत पुन्हा .सरपंचाकडे विचारणा केली असता जुलै २०२४ पर्यंत  स्मशानभूमीचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते.

 स्मशान भूमी सभोवताली घनदाट झाडझुडपं होती. काटेरी झाडामुळे प्रेत घेऊन जाताना एक दिव्य प्रवास करावा लागत होता. गावाने स्वतः पदर मोड करीत  १०,०००/ खर्च करून जेसीबी मशीन लावून स्मशान भूमी सभोवतालचा परिसर साफ केला.

२४ तास मुसळधार पाऊस या भागात कोसळत असतो अशा परिस्थितीत अंत्यविधी कसा करावा असा प्रश्न ग्रामस्थाकडून केला जात आहे. या कामात ग्रामपंचायतीने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक पातळीवरील शासनाचा एक भाग. शासनाला या कुणाच्या मरण्याच सोयरसुतकच नाही अस खेदाने म्हणावे लागते.पुढील महिन्याभरात या स्मशानाची पूर्ण डागडूजी झाली नाही तर शव ॲम्बुलन्सने ग्रामपंचायतीत आणल जाईल असा इशारा सुभाष ल.गवस यांनी दिला आहे.

निधीच नाही तर काम कुठून करणार : सरपंच सोनाली गवस

14 व 15 वित्त आयोगा मार्फत आम्ही समबंधित स्मशानशेड  चा प्रस्ताव पाठवलेला आहे मात्र त्याला अद्याप निधीच मंजूर झाला नाही ते आम्ही काम कुठून करायचे. मात्र निधी मंजूर झाल्यानंतर तात्काळ या स्मशान शेडचे काम करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले