सावंतवाडी : अवकाळी पावसाने कोकणातील नुकसान झालेल्या आंबा आणि काजूच्या बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे - परब यांनी तहसिलदार यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. ६ जानेवारी २०२४ म्हणजे सोमवारी कोकणातील विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढगाळ असून सावंतवाडी येथे अनेक ठिकाणी पाऊसही पडला आहे. सावंतवाडी परिसरातील महत्त्वाचे पीक आंबा व काजू याची मोहर प्रक्रिया सुरु होण्याच्या कालावधीमध्ये थंडी न पडता या ढगाळ वातावरणामुळे रोगराईची वाढ होत असून शेतकरी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
कोकणातील शेतकऱ्याला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू ची नुकसान भरपाई मिळण्याकरता त्वरित पाहणी करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व संपूर्ण कर्जमाफी करणेत यावी अशी मागणी या पत्रातून अर्चना घारे यांनी केली आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी संबंधित विभागाला त्वरित आदेश लगेचच दिले आहेत. यावेळी जिल्हा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रेवती राणे, पुंडलिक दळवी, सुधा सावंत, मारीता फर्नाडिस, काशिनाथ दुभाषी, झहूर खान, पूजा दळवी, उल्हास सावंत, गंगाराम परब, योगेश साळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.