कणकवली : भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान भारतीय नागरिकांच्या हक्कांचे आजवर रक्षण करत आले आहे. पण आज देशातील हुकूमशाही राजवटीमुळे भारतीय संविधान धोक्यात असून संविधानाला च खऱ्या अर्थाने रक्षणाची गरज आहे. त्यामुळेच युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने जिल्ह्यात युवक युवतींना संविधान पुस्तिका वाटप करून जनजागृती करुन बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करत असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.
सुशांत नाईक यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी संविधान पुस्तिकेचे वाटप खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक युवतीना करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, धीरज मेस्त्री, संदीप कदम, सूर्यकांत कदम, रोहन कदम ,जयेश धुमाले,नीतेश भोगले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुशांत नाईक म्हणाले की आज भाजपा आणि नरेंद्र मोदी हे देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. भाजपाचे 370 खासदार निवडून आणण्यामागे त्यांचा उद्देश भारताची घटना बदलवण्याचा आहे. घटनेने दिन दलित वंचितांना दिलेले संरक्षण काढून मनुवादी घटना आणण्याचा भाजपाचा डाव आहे. देशाच्या लोकशाहीला हे घातक असून भाजपाच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात युवकांनी लोकसभेला मतदान करून संविधानाचे रक्षण करावे असे नाईक म्हणाले.