जि. प. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने आंदोलन करणार : रुपेश राऊळ

Edited by: विनायाक गावस
Published on: July 04, 2023 12:53 PM
views 106  views

सावंतवाडी : शिंदे - फडणवीस सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. तसेच स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर गद्दारी करूनही जनतेला न्याय देऊ शकेल नाहीत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील गावागावात जनतेच्या दरबारात जनजागृती करा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषद शाळात शिक्षक दिले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला.

सावंतवाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक रूपेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आदीनारायण मंगल कार्यालय झाली. माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,महिला तालुका संघटक भारती कासार, तनुश्री झारापकर, युवा सेना संघटनेचे गुणाजी गावडे, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, सुनील गावडे रोहीणी गावडे, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.

राज्यातील राजकीय परिस्थिती, गद्दारानी केलेल्या कारभाराची चर्चा करून सावंतवाडी तालुक्यात गावागावात संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच शिंदे फडणवीस सरकारचे अपयश, स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची अकार्यक्षमता जनतेसमोर ठेवली पाहिजे त्यासाठी आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजे अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.

उप तालुका प्रमुख आबा सावंत यांनी  प्रास्ताविक केले. यावेळी विभाग प्रमुख, महिला आघाडी, युवा सेनेने गावागावात पोहोचले पाहिजे म्हणून संघटना बांधणी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच  स्थानिकांपर्यंत सरकारचे अपयश पोहोचले पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार म्हणाले, शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर्व पातळीवर अपयशी ठरले आहेत त्यामुळे लोकांपर्यंत जाऊन त्यांचे अपयश मांडले पाहिजे. येणारा काळ शिवसेनेसाठी पोषक असला तरी आपण सर्वांनी एकजुटीने काम केले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संघटना मजबूत केली तरच आपल्याला यश मिळू शकते असे त्यांनी सांगून केसरकर यांच्या कारभाराचे वाभाडे यावेळी मांडले.

शिवसेनेचे, माजी सभापती बाळा गावडे म्हणाले, जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत येणाऱ्या काळात संघटना मजबूत करण्यासाठी निर्णय झाला असून निवडणुकांच्या धर्तीवर संघटना  वर भर द्यावा असे ठरले आहे.आता राजकीय वातावरण पाहता संघटना मजबूत करणे गरजेचे आहे.

 शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरले असून प्रचंड महागाई झालेली आहे तसेच शिक्षण, आरोग्य, अशा प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य लोकांना समस्या भेडसावत आहेत त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सर्वांनी एकजुटीने आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. पक्ष बांधणी करताना पक्षाचे आदेशाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. संघटन कार्यक्रमात वाहून घेतले पाहिजे. जिल्हा कार्यकारणी संघटना बळकटीवर भर देण्यात आला आहे त्यासाठी गावागावात पोहोचून शाखा बांधणी करणे आवश्यक आहे. शिक्षण मंत्री केसरकर यांच्या भोंगळ  कारभारामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाही आहेत तसेच शिक्षकांना विना काही शाळा आहेत त्या शाळा बंद होण्याच्या अगोदर पालकांना सोबत घेऊन आंदोलन केले पाहिजे. जिल्हास्तरावरील आंदोलन झाल्यानंतर तालुकास्तरावर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे ते म्हणाले.

राऊळ म्हणाले, पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस भगवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येईल. सावंतवाडी विधानसभा प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे त्या माध्यमातून शिवसेनेची ताकदही दाखविली पाहिजेत.शिवसेनेच्या माध्यमातून होणारे कार्यक्रम आणि सरकारच्या विरोधात होणारे आंदोलनाला मोठ्या ताकदीने सर्वांनी उपस्थिती दर्शवली पाहिजे. त्यासाठी यापुढे हलायचे नाही डुलायचे नाही, मागे वळून पाहायचे नाही ,जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊया. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून लढूया आणि संघटना बांधूया असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे  उप तालुकाप्रमुख बाळू माळकर, संतोष गोवेकर, राजू शेटकर, विभाग प्रमुख आबा केरकर, बबन गावडे, नामदेव नाईक, सुनील गावडे, उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे, महेश शिरोडकर, उल्हास परब, विनोद ठाकूर, भगवान गवस ,दिलीप राऊळ, संदीप गवस, रूपाली चव्हाण, श्रृतीका दळवी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद शेख, रियाज शेख, संदेश कवठणकर, अनिल जाधव, सचिन मुळीक तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.