माजगाव म्हालटकरवाड्यातील ढालोत्सवाची सांगता

Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2025 19:32 PM
views 94  views

सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील सात दिवस गजबजलेल्या ढालोत्सवाची शेवटची रात्र सोमवारी संपन्न झाली. लोककला टिकवण्याबरोबरच त्यांच्या प्रसाराचे कार्य नकळत करणाऱ्या या उत्साहाची गोडी महिलांच्या प्रचंड सहभागाने द्विगुणित झाली.

माजगाव म्हालटकरवाड्यातील महादेवाचे देवस्थान हे उत्सवाचे केंद्रस्थान असते. यावर्षी माजगाव म्हालटकलकरवाड्याचा ढालोत्सव शुक्रवार 24 जानेवारी रोजी सुरू झाला होता. आठ दिवसांनी 31 जानेवारीला दुपारी बारा वाजता त्याची सांगता झाली.

सात दिवस चालणाऱ्या धालोत्सवात  महिलांना सात रात्री ओव्या लोकगीते फुगडी असे पारंपारिक कार्यक्रम करून नंतर सर्व महिला भांड्यावर एकत्र चहा पाण्याच्या कार्यक्रमात मनसोक्त एकमेकांशी संवाद साधतात. सहाव्या रात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे वाड्यातील पुरुष कासाराची भूमिका करून मांडावर जमलेल्या सर्व स्त्रियांना आंब्याच्या पानांच्या बांगड्या भरतात. सातवी रात्र सहाव्या रात्रीपेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असते तसेच हे रात्र जागवली जाते रात्री दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होते. स्त्रियांमधील दोघी पती-पत्नी वेशभूषा करतात त्यांची वाजत गाजत वरात काढली जाते. नवरा देवघरातून सुटून लग्नासाठी वाड्यातून वराती सह येतो. तुळशी कडे येऊन दानोषाला बसतो. तिथून तो मांड्यावर येतो. यावेळी फुगड्या गाणी आदी कार्यक्रम होतात. हा सगळा कार्यक्रम सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतो. पहाटे त्यातीलच एक स्त्री पिंगळीची भूमिका करते व सर्व घरे फिरते. त्यावेळी तिला घरातून पैसे दिले जातात. कार्यक्रम येथे संपतो.

आठव्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परत पांगलेली माणसे व स्त्रिया मांडावर जमतात. या दिवशी सांगत असल्याने गावातील सगळेजण कार्यक्रमाला जातात. त्यावेळी नवस बोलण्याचा कार्यक्रम होतो. प्रथम नाचणाऱ्या स्त्रियांवर शिवकाळा उभा राहतात व  स्त्रिला मुल नसते ती स्त्री विहिरीवर स्नान करून पांढरी साडी नेसून ओल्यानेच मांडावर येते, मांडा वरील शेणाच्या तुळशीत शुभ शिवकाळांच्या मदतीने सोबत आणलेली आळत व दुधाचे मिश्रण त्यावेळी ओव्या म्हणतात. तिला आधार देणाऱ्या स्त्रिया आशीर्वाद देतात. त्यांचा आशीर्वाद घेऊन ती घरी जाते व साडी बदलून येते. आशीर्वाद देणाऱ्या स्त्रिया तिच्या ओटीत नारळ घालतात त्याचे खोबरे फक्त त्या पती-पत्नीनेच खावे अशी अट असते. पुन्हा त्या स्त्रीला अंधार आशीर्वाद देतात.

त्यानंतर अंधार उभे राहणाऱ्या स्त्रियांच्या मोठ्या भरण्याचा कार्यक्रम होतो. दुपारी बारा वाजता या सर्व स्त्रियांच्या जागरणांची समाप्ती होऊन कार्यक्रम संपतो. स्त्रियांना हुरहुर लावून सात दिवसाच्या गजबजलेल्या कार्यक्रमाची सांगत होते.